शेतकर्‍यांनी जगायचे कसे?

निसर्गाच्या लहरीपणामुळे शेती व्यवसायच अडचणीत आला आहे. उत्पन्न वाढीच्या अनुशंगाने शेतकरी वेगवेगळे प्रयोग करतात पण निसर्गाची अवकृपा सातत्याने होत असल्याने पदरी निराशाच पडत आहे. आधीच गत दीड वर्षांपासून कोरोना आणि लॉकडाऊनच्या दृष्टचक्रात भरडला जात असलेल्या शेतकर्‍यांनी गत खरीप हंगामात मोठ्या उत्साहात पेरणी केली. सुरुवातील झालेल्या समाधानकारक पावसामुळे संपूर्ण शेतशिवार हिरवंगार झालं होतं. मात्र त्याला न जाणो कुणाची नजर लागली! सप्टेेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टी, वादळी पाऊस व पूरामुळे कापूस, सोयाबीन, उडीद, तूर, मुग आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. या धक्क्यातून कसेबसे सावरत असतांना आता आता अवकाळी पावसाने शेतकर्‍यांना पुन्हा एकदा रडवलं आहे. ढगाळ हवा आणि अवकाळी पावसामुळे कांदा, द्राक्ष, केळी ही पिकं संकटात आहेत. पिकांवर रोगाचं प्रमाण वाढलंय. अवकाळी पावसामुळे अंतिम टप्प्यात आलेल्या तूर पिकावर किडींचा प्रादुर्भाव वाढत आहे. सध्या तूर फुलोर्‍यात तर कुठे शेंगा लागण्याच्या अवस्थेत आहे, अशा स्थितीत तुरीवर शेंगा पोखरणार्‍या हिरव्या अळीचा प्रादुर्भाव वाढला आहे आणि त्यामुळे शेतकर्‍यांची चिंता सुद्धा वाढली आहे. याचा मोठा परिणाम उत्पादनावर होण्याची भीती व्यक्त होत आहे. या वातावरणाचा फटका सोयाबीन, उडीद आणि मूग या पिकांवरही बसण्याचे चिन्ह आहेत. कोकणात आंबा आणि काजू पिकावर त्याचा परिणाम झाला आहे. 



...तरी झालेले नुकसान भरुन निघणार नाही

मागील काही वर्षांपासून शेतकर्‍यांना निसर्गाच्या लहरीपणाचा सामना करावा लागत आहे. कोरोनामुळे आधीच शेतीचे अर्थचक्र मोडले आहे. त्यात अतिवृष्टीमुळे सलग दुसर्‍या वर्षी देखील खरीप हंगाम हातातून निसटल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. गुलाब चक्रीवादळामुळे सप्टेेेंबर महिन्यात मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाल्याने शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. अनेक जिल्ह्यातील पिके पाण्याखाली गेली असून शेतकर्‍यांचा हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला. काढणीला आलेले सोयाबीन, मुग, उडीद, भुईमूग आदी पिके नामशेष झाली. तर कपाशी, मका, बाजरीची पिके आडवी झाली. अतिवृष्टीमुळे कांदा, बाजरी, मका, सोयाबीन पिकांना पावसाचा फटका बसला, तर अतिपावसाने जमिनी खरवडल्या आहेत. शेतात सोंगून ठेवलेला मका, सोयाबीन भिजले. डाळिंब बागा, कांदा, भाजीपाला पिकांचेही मोठे नुकसान झाले. शेतकर्‍यांनी मागील संकटांचे मालिकाही संपता संपत नाही. कधी अवकाळी पाऊस तर कधी ढगाळ वातावरणामुळे अगोदरच त्रस्त झालेल्या शेतकर्‍यांना पुन्हा अवकाळी पावसाला सामोरे जावे लागत आहे. वातावरणातील बदलाचा फटका पिकांना बसला आहे. खरिपाचे तर अतोनात नुकसान झाले होते त्या संकटातून सावरून शेतकर्‍यांनी रब्बी हंगामाची तयारी सुरू केली होती परंतु पुन्हा अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकर्‍यांपुढेसंकट आ वासून उभी आहे. याचा फटका फळबागांना मोठ्या प्रमाणात बसत आहे. फळबागा आता अंतिम टप्प्यात असतानाच अवकाळी पावसाने आणि बदलत्या वातावरणाने त्यांच्यावर विपरीत परिणाम झाला आहे. त्यासोबतच आता रब्बी हंगामा वरही अवकाळी पावसाचा आणि ढगाळ वातावरणाचा परिणाम होत आहे. मुंबई तसेच कोकणविभागातील रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये पावसाने हजेरी लावल्याने फ्लॉवर, कांदा आणि द्राक्ष सारख्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे त्यासोबतच रोगांचे प्रमाणही वाढले. अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे नाशिक आणि सांगली जिल्ह्यातील द्राक्षबागा संकटात सापडल्या आहे. द्राक्षांवर फळकूज, मणीगळ, डाऊनी व भुरा रोगाचा प्रादुर्भाव वाढत आहे. आता याचे व्यवस्थापन केले तरी झालेले नुकसान भरुन निघणार नाही. 

शेतकर्‍यांना पुन्हा एकदा उभे करण्याची आवश्यकता

टोमॅटोचे पीक आता बहारात असताना त्यांच्या हातात चांगला पैसा येण्याची आशा होती, परंतु या अवकाळी पावसामुळे टोमॅटो खराब होत आहे. या अवकाळी पावसामुळे कांदा उत्पादक शेतकर्‍यांना नुकसान सोसावे लागत असून कांदा वाचवण्यासाठी महागड्या औषधांची फवारणी करावी लागत आहे. तसेच परिस्थिती तूर या पिकाचे असून तूर पिक आता फुलोरा अवस्थेत आहे तर कुठे शेंगा लागण्याच्या अवस्थेत असताना त्या बदलत्या हवामानाचा प्रभाव तुरीवर झाला आहे. तुरीवर शेंगा पोखरणार्‍या अळीचा प्रादुर्भाव वाढला आहे आणि त्यामुळे शेतकर्‍यांची चिंता सुद्धा वाढले आहे. कोकणात आंबा आणि काजू पिकावर परिणाम झाला आहे. या वातावरणाचा फटका आंब्याला बसला असून आंबा पिकावर तुडतुडे आणि बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढत आहे. महाबळेश्वर आणि पाचगणी येथे स्ट्रॅाबेरीचे उत्पादन घेतले जाते. उत्पन्न वाढीच्या अपेक्षेने लाखो रुपये खर्ची करुन शेतकरी हे धाडस करतात पण आता काढणीच्या दरम्यानच पिकाला मोठा फटका बसला असून शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. समाधानकारक पावसामुळे यंदा रब्बी हंगाम मोठ्या जोमात बहरेल असे चित्र होते. शिवाय मुबलक प्रमाणात पाणी असल्यामुळे शेतकर्‍यांची चिंताही मिटली होती. पण आता पावसाच्या नुकसानीचे ग्रहन शेतकर्‍यांची पाठ सोडायला तयार नाही. अतिवृष्टीने खरीप हंगामातील सोयाबीन, उडीद, तूर या पिकांचे नुकसान झाले तर आता अवकाळीमुळे हरभरा, गहू या मुख्य पिकांवर किडीचा प्रादुर्भावर वाढत आहे. बुरशीनाशक व किडनाशक मिसळून फवारणी करण्याचा सल्ला कृषी विभागाकडून दिला जात आहे. मात्र, पिक जोपसण्यातच होत असलेल्या खर्चामुळे शेतकर्‍यांचे कंबरडे मोडले आहे. एकामागून एक सुरु असलेली ही संकटांची मालिका केंव्हा संपेल, याचेच उत्तर शेतकर्‍यांना मिळत नाहीए. अशा संकटकाळी शेतकर्‍यांना भरघोस मदत देवून त्यांना पुन्हा एकदा उभे करण्याची आवश्यकता आहे. यासाठी सर्व पक्षांनी सोईचे राजकारण बाजूला ठेवून व मदतीत आडकाठी आणणार्‍या शासकीय नियमांना बाजूला ठेवावे लागणार आहे. आता या क्षणाला शेतकर्‍यांना मदतीचा हात मिळाला नाही तर तो संकटातून उभा राहू शकणार नाही.


Post a Comment

Designed By Blogger