महाराष्ट्रात पुन्हा हुर्रर्र

शेतातील हंगाम संपल्यानंतर ग्रामदैवत असलेल्या ठिकाणी धार्मिक यात्रा, जत्रा, उरूस, निराळ्या नेत्यांच्या वाढदिवसानिमित्त बैलगाडा शर्यतींचे आयोजन खूप आधीपासून केले जात आहे. ‘बैलगाडा शर्यत’ महाराष्ट्राच्या प्राचीन संस्कृतीचा व पारंपरिक प्रथेचा भाग आहे, यामध्ये विविध ठिकाणी पारंपरिक उत्सवामध्ये वळू अथवा बैलांच्या धावण्याच्या शर्यतीचा समावेश असतो. बैलगाडा शर्यतींना महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये बैलगाडा शर्यत, छकडा अथवा शंकरपट असेही संबोधले जाते. बैलगाडा शर्यतींमध्ये बैलांचा छळ होत असल्याच्या कारणावरुन पेटा या संस्थेने न्यायालयात धाव घेतल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडी शर्यंतीवर महाराष्ट्रात बंदी घातली होती. तेंव्हापासून आजतयागत बैलगाडा शर्यतींवर बंदी होती. यावरुन गत काही वर्षांपासून राजकीय वातावरण तापत होते. आता बैलगाडा शर्यतीला सर्वोच्च न्यायालयाने सशर्त परवानगी दिली आहे. त्यामुळे बैलगाडा मालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. तब्बल ७ वर्षांनी राज्यात बैलगाडा शर्यतीचा धुरळा उडणार आहे. 



बैलगाडा शर्यतसुद्धा पारंपरिक खेळ

बैलगाडी शर्यतीचा इतिहास तसा फार जुना आहे. पशुपालक शेतकर्‍यांसह समाजातील सर्व स्तरांतील लोकांना या बैलगाड्या शर्यती आकर्षित करीत आल्या आहेत. आपल्या देशात देखील शेतीचा हंगाम संपल्यानंतर पशुपालक शेतकरी वेगवेगळ्या ग्रामदेवतांच्या यात्रा, जत्रा, उरूस यामधून आपले कौशल्य, जसे की वजन उचलणे, तलवार फिरवणे, कुस्त्या अशा प्रकारच्या कौशल्याचे प्रदर्शन करतात, मनोरंजन करतात व आनंद लुटतात. बैलांच्या काळजीपूर्वक संगोपनातून त्याचा वापर केला जातो. बैलगाडा शर्यत ही वेग आणि अंतर कापण्याच्या कालावधीवर बेतलेली असते. पशुपालकासह सर्वांनी एकत्र येऊन आनंद उपभोगावा हा हेतू असतो. त्याचप्रमाणे बैलगाडा शर्यतसुद्धा पारंपरिक खेळ म्हणून सादर केला जातो. भारतातील तामिळनाडू, कर्नाटक, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश, पंजाब, गुजरात, छत्तीसगढ येथे आजही बैलगाडा शर्यती सुरू आहेत. पण न्यायालयाच्या स्थगितीमुळे महाराष्ट्रात बैलगाडा शर्यतींना बंदी घालण्यात आली होती. बैलगाडा शर्यतींचा मनोरंजन व शक्ती प्रदर्शनाचा दुसरा पैलू महत्वाचा आहे. तो म्हणजे, बैलगाडा शर्यतीच्या आयोजनामागे ग्रामीण अर्थकारणाचा देखील एक महत्त्वाचा पैलू आहे. ज्या गावात शर्यत आयोजित केली जाते, त्या गावाच्या अर्थकारणावर याचा मोठा प्रभाव पडतो. शर्यतीचे आयोजनाच्या निमित्ताने, लावण्यात आलेली विविध दुकाने, जसे की बैलांना सजविण्याच्या वस्तू विकणारे, शेतीसाठी उपयोगी वस्तू विकणारे, चहा-पाण्याची हॉटेल्स चालविणारे, बैलांच्या धावण्याचा पट्टा तयार करणारे, बैलांची वाहतूक करणारे, वाजंत्रीवाले, भोंगेवाले, छपाई करणारे, चारा विकणारे अशा अत्यंत छोटेखानी व्यवसाय चालविणार्‍यांचा उदरनिर्वाह होत असतो. मात्र पेटा संस्थेने बैलाच्या होणार्‍या छळाबाबत याचिका दाखल केली होती. शर्यतीत बैलांना चाबकाने, मोठ्या काठीने अमानुष मारणे, बॅटरीचा शॉक देणे, टोकदार खिळे लावणे, अशा अनेक प्रकारे अत्याचार केले जातात, असे सांगत प्राणीमित्रांनी शर्यतींवर बंदी घालण्याची मागणी केली होती. बैलगाडा शर्यत सुरु असताना बैलाचा छळ केला जात असल्याचा आरोप या पेटा या संस्थेने केला होता. त्यानंतर २०१७ साली मुंबई हायकोर्टाने बैलगाडा शर्यतींवर बंदी घातली होती. महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यती थांबली. ती आजतागायत थांबलेलीच होती. बैलगाडा शर्यतीवरील बंदी सरकारने उठवावी या मागणीसाठी राज्यभर आत्तापर्यंत अनेक आंदोलने देखील झाले. या संदर्भात खासदारांनी संसदेत मागणी केली. आमदारांनी आंदोलन केलं. मात्र, ही बंदी उठली नव्हती. 

शेतकर्‍यांची भावनिक नाळ 

उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मुकूल रोहतगी यांनी या प्रकरणात राज्य सरकारची बाजू मांडली. बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवण्यासाठी राज्य सरकारने दाखल केलेल्या याचिकेवर बुधवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली होती. यावेळी बैल हा धावणारा प्राणी आहे की नाही याबाबत राज्य सरकारने स्थापन केलेल्या सत्यशोधन समितीच्या अहवालाद्वारे रोहतगी यांनी काही मुद्दे मांडले. यानंतर पेटा या संस्थेच्या वतीने  बैल हा धावू शकणारा प्राणी नाही, बैलाचे पोट मोठे आहे. त्यामुळे तो धावू शकत नाही असा पेटाचे वकील अ‍ॅड ग्रोव्हर यांनी युक्तिवाद केला. दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने राज्यात बैलगाडा शर्यतीला सशर्त परवानगी दिली. बैलगाडा शर्यती आयोजित करताना नियमांचे पालन करावे लागेल. नियमांच्या चौकटीत राहून शर्यतीचे आयोजन करावे लागेल. पशू क्रूरता प्रतिबंधक कायद्यातंर्गत नियमांचे पालन करणे बंधनकारक असेल. या निर्णयामुळे पशुमालकांना आनंद झाला आहे. शेतकर्‍यांसाठी बैलगाडीची शर्यत ही केवळ अन्य खेळांप्रमाणे एखादी स्पर्धा नसते. याच्याशी शेतकर्‍यांची भावनिक नाळ जोडली गेली आहे. जर आपण कोरोना आणि लॉकडाऊनच्या काळ पाहिला तर यात अनेक सण साजरे करता आले नाहीत. गेल्या काही महिन्यांपूर्वी राज्यात पोळा सण साजरा झाला. कोविडची पार्श्वभूमी आणि राज्यातील काही भागात पावसाची झालेली अवकृपा, त्यामुळे माध्यमातून खूप काही चर्चा, फोटो पाहायला मिळाले नाहीत. मात्र ग्रामीण जनजीवनात बैलांला मोठे महत्व राहिले आहे. आता बैलागाडी शर्यतील न्यायालयने सशर्त परवानगी दिली असल्याने. शेतकर्‍यांनी मोठी लढाई जिंकली आहे, अशीच भावना दिसून येते. काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने तीन कृषी कायदे रद्द केल्यानंतर दिल्लीच्या सीमेवर आंदोलक शेतकर्‍यांनी जल्लोष केला मात्र महाराष्ट्रात त्याचे परिणाम दिसले नाही. यातील राजकरणाचा मुद्दा जरी बाजूला ठेवला तरी त्या निर्णयापेक्षा आता बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठविण्याच्या निर्णयाचा शेतकर्‍यांना जास्त आनंद झाला आहे, असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. असे असले तरी लगेच उत्साहाच्या भरात मोठ्या प्रमाणात शर्यतींचे आयोजन करणे धोकादायक ठरु शकते. कारण कोरोनाचे संकट अजूनही संपलेले नाही, याचे भान आयोजनकांनी ठेवायला हवे.

Post a Comment

Designed By Blogger