दुष्काळाकडून ओल्या दुष्काळाकडे

दोन आठवड्यांपूर्वी दुष्काळाच्या फेर्‍यात येऊ पाहणार्‍या खान्देशात विशेषत: जळगाव जिल्ह्यात अतिवृष्टी आणि पावसाची संततधार गेले आठ दिवस कायम असल्याने परिसरावर ओल्या दुष्काळाचे सावट गडद झाले आहे. त्यामुळे पिकांची वाटचाल दुष्काळाकडून ओल्या दुष्काळाकडे झाली आहे. गेल्या आठवड्यात चाळीसगाव तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीतून सावरत नाही तोच आता जामनेर तालुक्यासह अनेक गावांमध्ये ढगफुटी सदृष्य पाऊस झाल्याने मोठे नुकसान झाले आहे. वित्तहानीसह जीवतहानी देखील झाली आहे. पशुधनाचीही अपरिमित हानी झाली आहे. अनेकांची घरे, संसार पुरात स्वाहा झाली. अतिवृष्टीसह पुराचा मार झेलणारा बळीराजा ओल्या दुष्काळाच्या भरून आलेल्या सावटाने चिंतातुर झाला आहे. गत दोन वर्षांपासून कोरोनामुळे शेती व्यवसायावर आर्थिक ताण आला आहे. शहरी बाजारपेठेलाही शेती अर्थकारणाला नख लागल्याने फटका बसला आहे. अनेकांची घरे उद्ध्वस्त झाली आहेत, बहुतांश जनावरे मृत्युमुखी पडली आहेत, लाखो हेक्टरवरील पिके वाहून गेली आहेत. शेतात कुठे गाळ साचला तर कुठे खरडून गेले आहे.



शेतकर्‍यांच्या शेतात व डोळ्यात पाणी

शेतकरी व कृषीक्षेत्रात एकामागून एक सुरु असलेली संकटांची मालिका संपायचे नाव घेत नाही. राज्यात सर्वत्र मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे नदी-नाले तुडूंब भरले असून, राज्यात काही ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. नदी-नाल्याचे पाणी शेतांमध्ये शिरल्याने अनेक ठिकाणी पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून, शेतकर्‍यांना मोठा फटका बसला आहे. एका बाजूला कोरोना व्हायरस संक्रमनाचे संकट. तर, दुसर्‍या बाजूला मुसळधार पावासामुळे होणारे शेतीचे नुकसान अशा दुहेरी संकटात राज्यातील बळीराजा सापडला आहे. हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार अजून किमान तिन-चार दिवस पाऊस सुरु राहणार आहे. राज्यात पावसामुळे पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल आहेच, पण जगायचे कसे आणि मरायचे कसे या विवंचनेत आहे. आधीच शेतकरी आत्महत्यांचे सत्र थांबायचे नाव घेत नाही. त्यात आता पावसाने भर घातली आहे. गेल्या आठवडाभरापासून महाराष्ट्राच्या अनेक भागात मुसळधार पाऊस पडत आहे. जळगाव जिल्ह्यात चाळीसगाव व जामनेर तालुक्यातला पावसाचा फटका मोठ्या प्रमात बसला आहे. यंदा आतापर्यंत दमदार पाऊस झाल्याने जळगाव जिल्ह्यातील सर्वच प्रकल्प फुल्ल भरले आहेत. अभोरा, मंगरूळ, सुकी, अग्नावती, हिवरा, तोंडापूर, मन्याड, बोरी, गिरणा व वाघूर धरण ओव्हरफ्लो झाले असून, हतनूरमधे जास्त पाणी साठा झाल्याने त्यातून पाण्याच्या आवकमुळे विसर्ग सुरू आहे. जिल्ह्यात गिरणा नदीला मोठा पूर आला आहे. त्यामुळे चाळीसगाव, भडगाव, पाचोरा, धरणगाव शहरांसह १५८ ग्रामीण पाणीयोजनांचा पाणीप्रश्न निकाली निघाला आहे. जिल्ह्यातील बहुतांश प्रकल्प ओव्हरफ्लो झाल्याने शेतीसाठीही पाणी मिळणार आहे. ही सकारात्मक बाजू असली तरी दुसर्‍या बाजूला सध्या सुरु असलेल्या पावसाच्या धुमाकुळीमुळे शेतकर्‍यांच्या शेतात व डोळ्यात असे दोन्ही ठिकाणी पाणी आले आहे. गेल्या तिन दिवसात झालेल्या वादळी वार्‍यासह झालेल्या पावसाने केळी बागा उद्ध्वस्त झाल्या. यासोबतच मका, ज्वारी, कापूस या पिकांचेही नुकसान झाले आहे. केळीची झाडे जमीनदोस्त झाली आहेत. कपाशी पूर्णत: झोपली आहे तर ज्वारीचे व मक्याचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. 

.... तेंव्हाच शेतकर्‍यांच्या डोळ्यातील अश्रू पुसता येतील

गत ४८ तासात खान्देशात सर्वत्र पावसाने हजेरी लावली. यात जळगाव जिल्ह्यात सर्वाधिक तर त्याखालोखाल धुळे जिल्ह्यात पाऊस झाला. जळगाव जिल्ह्यातील वाघूर व तापी काठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. तर अमळनेर तालुक्यातील सात्री येथील आरुषी सुरेश भिल (१३) बालिकेला नदीच्या पुरामुळे उपचारांसाठी नेता आले नाही. यामुळे नदी पार करण्याचा प्रयत्न करीत असताना नदीकाठीच तिचा मृत्यू झाला. जामनेर तालुक्यात जोरदार वादळी पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. त्यात १८ गावांतील १८० घरांची पत्रे उडून गेली आणि दुकानांमध्ये पाणी शिरले आहे. शेतीचेही मोठे नुकसान झाले. हिंगणे येथे २० घरांचे, ओखर आणि ओझर बुद्रुक या दोन्ही गावांमध्ये प्रत्येकी ४० घरांचे पत्रे उडाले आहेत. रामपूर येथे १०, लहासर येथे १५ घरांचे पत्रे उडाले आहेत. ढालशिंगी येथे चार घरांची पडझड झाली आहे. त्यासोबत तळेगाव आणि पहूर येथे दुकानांमध्ये पाणी शिरले आहे. मन्याड धरण परिसरात ढगफुटी सदृष्य पाऊस झाल्याने धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु आहे. यातच अतिवृष्टीने नांद्रे गावाला पुराचा वेढा पडला आहे. शेतकर्‍यांच्या शेतातील कपाशी, मका, पपई पिक वाहुन गेले. ओढरे, चितेगाव, उंबरहोळ येथील  लघु व मध्यम प्रकल्प ओव्हरफ्लो झाले आहेत. जळगाव जिल्ह्यातील वाघूर व हतनूर धरणात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात सुरू आहे. यामुळे धरणांच्या पातळीत चांगलीच वाढ होत आहे.जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथे तितूर आणि डोंगरी तर अमळनेर येथे बोरी व जामनेरला कांग नदीला पूर असून जामनेर आणि भुसावळचा रस्ता बंद झाला होता. अतिवृष्टी आणि पुराच्या रूपाने जळगाव जिल्ह्यावर मोठे संकट कोसळले आहे. धुळे जिल्ह्यातील परिस्थिती यापेक्षा वेगळी नाही, वादळी पावसामुळे पिकांना फटका बसून पिके भुईसपाट झालेली आहेत. धुळे जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये ऑगस्ट महिन्याच्या अखेरच्या पंधरवड्यात पावसाने मात्र जास्तच कहर केला होता. सप्टेंबर महिन्यात देखील वादळीवार्‍यासह पाऊस झाला. त्यातून सावरत नाही तोच गत दोन-तिन दिवसापासून होत असलेल्या अतिवृष्टीने खरीप हंगामातील कपाशी बाजरी मका सर्वत्र डोलदार पिके आडवे पडून जमीनदोस्त झालीत शेतकर्‍यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. नंदुरबार जिल्ह्यातही केळी, पपई, उसाचे मोठे नुकसान झाले आहे. खान्देशावर ओढवलेल्या या आस्मानी संकटात बळीराजाला शासनाकडून मदतीचा हात देण्याची आवश्यकता आहे. यासाठी तात्काळ पंचनामे पूर्ण होणे अपेक्षित आहे. यानंतर राजकारणाचे जोडे बाजूला ठेवून सर्व पक्षिय नेत्यांनी एकत्र येण्याची आवश्यकता आहे. तेंव्हाच शेतकर्‍यांच्या डोळ्यातील अश्रू पुसता येतील.

Post a Comment

Designed By Blogger