विघ्नहर्त्या, सर्व संकटं दूर कर

महाराष्ट्राचे आराध्य दैवत, गणरायाचे मंगलमय वातावरणात शुक्रवारी सर्वत्र आगमन होत आहे. गणपती बाप्पाला विघ्नहर्ता देखील म्हटले जाते. सुखकर्ता आणि दुखहर्ता म्हणून सर्व भक्तगण बाप्पाचा धावा करतात मात्र विघ्नहर्त्या गणरायाचा सण म्हणून ओळखल्या जाणार्‍या गणेशोत्सवावर यंदाही कोरोनाचे सावट आहे. गतवर्षी कोरोना आणि लॉकडाऊनच्या दृष्टचक्रामुळे साध्यापध्दतीने साजरा झालेला गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा करण्याचे स्वप्न बाळगणार्‍यांचा यंदाही हिरमोड झाला आहे. सुमारे दीड वर्षांपासून संपूर्ण जग कोरोना विषाणूमुळे त्रस्त आहे. या विषाणूने लाखो जणांचा जीव घेतला तर कोट्यावधी जणांना उद्ध्वस्त केले आहे. या संकटातून बाहेर पडणार असे वाटताच नवे संकट उभे राहते. अशा संकटांच्या मालिकांमध्येच आजपासून दहा दिवस लाडक्या बाप्पाच्या आगमनाचा आनंदोत्सव सुरु राहणार असल्याने विघ्नहर्त्या बाप्पाकडे भरभरुन मागायचे आहे. बाप्पाकडे काही मागायचे असेल तर केवळ घरापुरता नव्हे तर राज्य, देश व संपुर्ण जगासाठी मागितले तरी गणराया नाही म्हणणार नाही! देवा तुच बनविलेल्या या पृथ्वीवर काय सुरु आहे, हे तुला दिसत असेलच, देवा आज संकटे चहुबाजूने आली असल्यासारखे भासत आहे. कधी निसर्गाच्या लहरीपणामुळे तर कधी मानवामुळे! ही सर्व संकटं बाप्पा आता तरी दूर कर, हीच एक प्रार्थना आहे!



बंधनांमुळे गणेशभक्तांचा हिरमोड

गणेशोत्सव म्हटला की, सर्वत्र धामधूम व उत्साहाचे वातावरण असते. मात्र गतवर्षाप्रमाणे यंदाही विघ्नहर्त्याच्या उत्सवावर विघ्न कायम आहे. राज्यावर कोरोनाच्या तिसर्‍या लाटेचे सावट असल्याने निर्बंध अजूनही शिथिल करण्यात आलेले नाहीत. याचा फटका गणेशोत्सवाला देखील बसला आहे. शुक्रवारपासून सुरु होणार्‍या गणेशोत्सवासाठी राज्य सरकारने मागील वर्षीप्रमाणे यंदाही नियम लागू केले आहे. गणेश मंडपात गर्दी टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गणेशोत्सव साजरा करण्यासाठी परवानगी आवश्यक असणार आहे. तसेच, सार्वजनिक गणेशमूर्ती ४ फूट आणि घरगुती गणेश मूर्तीची उंची २ फूट असावी, अशी सूचनाही सरकारकडून देण्यात आली आहे. कोरोनामुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता गणेश मंडपे मर्यादित स्वरुपात असावेत. या वर्षीचा गणेशोत्सव साध्या पध्दतीने साजरा करणे अपेक्षित असल्याने घरगुती तसेच सार्वजनिक गणपतीची सजावट करतांना त्यात भपकेबाजी नसावी. या वर्षी शक्यतो पारंपारिक गणेशमूर्तीऐवजी घरातील पातू/संगमरवर आदी मुर्तीचे पूजन करावे. मुर्ती शाडूची/ पर्यावरणपूरक असल्यास त्याचे विसर्जन शक्यतो घरच्या घरी करावे. विसर्जन घरी करणे शक्य नसल्यास नजिकच्या कृत्रीम विसर्जन स्थळी विसर्जन करण्यात यावे. सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी रक्तदान शिबीरासह कोरोना, मलेरिया, डेग्यू इ. आजार आणि उपाय तसेच स्वच्छता याबाबत जनजागृती करण्यात यावी. आरती, भजन, किर्तन वा अन्य धार्मिक कार्यक्रम आयोजित करतांना गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी. श्रीगणेशाचे दर्शनाची सुविधा ऑनलाईन, केबल नेटवर्क, वेबसाईट व फेसबुक इत्यादीद्वारे उपलब्ध करुन देण्याबाबत जास्तीत जास्त व्यवस्था करण्यात यावी. श्रींच्या आगमन व विसर्जन मिरवणूका काढू नयेत, आदी सुचना देत अनेक बंधने राज्य सरकारने लादली आहेत. या बंधनांमुळे गणेशभक्तांचा हिरमोड होणे स्वाभाविकच आहे. 

सर्व संकटांच्या मालिकांपासून तुच वाचव रे...देवा!

गतवर्षी काही गणेशोत्सव मंडळांनी मंडळ सजावट तसेच गणपतीची मूर्ती यावर होणारा खर्चाला फाटा देत, कोरोनाशी लढा देणार्‍या आपल्या कोविड योध्यांसाठी, डॉक्टर, नर्स, पोलीस, सेक्युरिटी गार्ड या देवदूतांसाठी विविध मदत करत आहे हि गोष्ट नक्कीच कौतुकास पात्र आहे. यामुळे सामाजिक भावना जपण्यास मदत झालाी होती. कोरोनाचे हे दीड वर्ष प्रचंड त्रासदायक होते. या काळात अनेकांना आपल्या जीवलगांना गमाविले आहे तर काहींना आपले सर्वच गमवले आहे. या काळात झालेले नुकसान कधीच भरुन निघणार नाही, हे देखील तितकेच सत्य आहे. या संकटातून बाहेर पडण्यासाठी आता केवळ विघ्नहर्त्या गणरायाचाच पर्याय शिल्लक राहिला आहे. आजपासून सुरु होणार्‍या गणेशोत्सवात कोरोना वाढणार नाही, असा संकल्प प्रत्येकाने करायला हवा. यासाठी प्रत्येकाने आपआपल्या परिने काळजी घ्यायलाच हवी. कारण तिसरी लाट आलेली कुणालाही परवडणार नाही. हे आपल्या हाती आहे. यामुळे यासाठी बाप्पाला त्रास देण्यात काही अर्थ नाही. गणपती बाप्पा ही बुध्दीची देवताही मानली जाते. कोरोनापासून बचावासाठी मास्क वापरणे, सार्वजनिक ठिकाणी काळजी घेत गर्दी टाळणे आदी खबदारदारी घेण्यासाठी बाप्पा सर्वांना सद्भुध्दी देवो! दुसरीकडे कोरोनामुळे देशाची अर्थव्यवस्था अजूनही अनिश्चितीच्या लाटांवर हिंदोळे खात आहे. अनेकांचे रोजगार गेल्याने देशात बेरोजगारी मोठ्याप्रमाणात वाढली आहे. महागाई दिवसेंदिवस नव नवे विक्रम स्थापन करत आहे. पेट्रोल व डिझेलचे दर दिवसेंदिवस वाढत असल्याने महागाईचा भडका उडाला आहे. कोरोनाचे संकट काय कमी होते म्हणून आता राज्यात अनेक ठिकाणी पावसाने थैमान घातले आहे. राज्यातील व देशातील वाचाळवीर राजकारण्यांनी कळस गाठला आहे. या राजकारण्यांना सुबुद्धी देशील का विनायका? सध्या महाराष्ट्रात जे सुरु आहे त्याच्या खोलात शिरलास तर देवा तुझेही डोके ठणकायला लागेल. बाप्पा आता तुला नुसतीच गार्‍हाणी सांगून उपयोग नाही. तू म्हणशील मी आलो नाही तर यांनी आपली गार्‍हाणी सुरू केली पण बाप्पा संकटमोचक म्हणून आम्ही तुझा धावा नाही करायचा तर कुणाचा करायचा? सरकारे येतात आणि जातात, प्रश्न मात्र तिथेच राहतात. राजकारण मात्र सर्रास सुरू राहते. त्यात मरतो तो गरीब! बाप्पा आता तू चांगला १० दिवस मुक्काम करणार आहेस आणि तू बुध्दीचा देवता आहेस. हा सण धार्मिकतेपेक्षा सांस्कृतिक, सामाजिक आणि मुख्य म्हणजे कौटुंबिक बंध मजबूत करणारा आहे. देवा सर्वांना सुबुद्धी दे. सौख्य, समाधान दे आणि राष्ट्रीय भावनेने, सद्विचाराने अवघा समाज समरस होऊ दे हीच एक अपेक्षा आहे. शेवटी बाप्पा तुझ्याकडे एकच मागणी करतो की, विघ्नहर्त्या सर्व संकटांच्या मालिकांपासून तुच वाचव रे...देवा!

Post a Comment

Designed By Blogger