भाजपाचे दक्षिणायन; ‘मिशन तामिळनाडू’

दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेता रजनीकांत यांनी तमिळनाडू विधानसभा निवडणूक २०२१ साठी आपल्या राजकीय कारकीर्दीविषयी मोठी घोषणा केली आहे. अभिनेते रजनीकांत यांनी प्रत्यक्ष राजकारणात येण्याचे ठरवले आहे. त्यासाठी ते आपल्या नव्या पक्षाची घोषणा ३१ डिसेंबरला करतील. २०२१ मध्ये तमिळनाडू विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. या निवडणुकांची रणधुमाळी आतापासूनच रंगतांना दिसत आहे. तामिळनाडूत सत्ताधारी अण्णा द्रमुक पक्षाशी युती करून भाजपचे चाणक्य म्हणून ओळखले जाणारे अमित शहा यांनी ‘मिशन तामिळनाडू’चा बिगुल वाजवला आहे. बिहार विधानसभेत सर्वांचे अंदाज चुकवित सत्ता हस्तगत केल्यानंतर तसेच काँग्रेसचा दिवसेंदिवस कमी होणार्‍या जनाधारामुळे भाजपाचा आत्मविश्‍वास दुणावला आहे. चंचूप्रवेश करीत आपला विस्तार कसा करायचा याची व्यूहरचना हेच भाजपचे निवडणूक लढविण्याचे तंत्र अलीकडच्या काळात राहिले आहे. भाजपाचे ‘मिशन तामिळनाडू’ हे केवळ विधानसभा निवडणुकांपुरता मर्यादित नसून याकडे २०२४च्या लोकसभेची तयारी म्हणून पाहिले गेले पाहिजे.



दक्षिणेतील राजकारण हे व्यक्तिवादी आणि भक्तिवादी

बिहार विधानसभेची निवडणूक जिंकल्यानंतर भारतीय जनता पक्षाने आता पुढील वर्षी विधानसभेच्या निवडणुका होणार्‍या तामिळनाडू, केरळ आणि पुदुच्चेरी या दक्षिणेकडील राज्यांकडे मोर्चा वळवला आहे. २०२१मध्ये होवू घातलेल्या तामिळनाडू विधानसभा निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर तामिळनाडूमधील राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. भाजपाचे नेते तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या तामिलनाडू दौर्‍यात भाजपाने केलेले शक्तिप्रदर्शन व त्यापाठोपाठ भाजपाने अण्णा द्रमुख पक्षाशी जाहीर केलेली युती, हे त्याचे बोलके उदाहरण आहे. एडीएमकेशी हातमिळवणी करून भाजपने काँग्रेसची वाट खडतर केली आहे. दुसरीकडे द्रमुकचे स्टॅलिन यांचे थोरले बंधू अलागिरी यांनी स्वतंत्र पक्ष स्थापण्याची घोषणा केल्याने द्रमुक कमकुवत होणार आहे. या पार्श्‍वभूमीवर राज्यात पाय रोवण्यास भाजपला संधी आहे. मात्र भाजपाची दक्षिणायन मोहिम दिसते तशी सोपी नाही. कारण जनसंघापासून सुरु झालेला भाजपाचा प्रवास पाहता भाजपाची प्रखर राष्ट्रवादी पक्ष अशी प्रतिमा राहिली आहे. त्याच्या अगदी उलट दक्षिणेकडील राज्यांची विशिष्ट सांस्कृतिक ओळख आहे. तमिळ किंवा द्रविड उपराष्ट्रीयतेसाठी भाजप आपल्या राष्ट्रीयतेत किती जागा निर्माण करू शकेल हे पाहावे लागेल. महत्वाचे म्हणजे दक्षिणेतील राजकारण हे व्यक्तिवादी आणि भक्तिवादी आहे. द्रमुकचे दिवंगत अण्णा दुरई यांच्यांपासून सत्तरच्या दशकाच्या अखेरीस चित्रपट अभिनेते एम. जी. रामचंद्रन त्यानंतर करुणानिधी आणि अम्मा अर्थात जयललिता यांच्यापर्यंताचा हा प्रवास त्याचेच प्रतिबिंब आहे.

लहान भावाच्या रुपात प्रवेश

तामिळनाडूच्या राजकीय पटलावर एकेकाळी काँग्रेसची ताकद दिसत होती मात्र  मात्र इतरत्र होत आहे तशीच काँग्रेसची पडझड तामिळनाडूतही झाली. तामिळनाडूत भाजप हा कधीच लक्षवेधी पक्ष नव्हता. परंतू तेथे पाय रोवण्याची तयारी भाजपाने २०१४ सुरु केली होती. तेथे पहिल्या टप्प्यात भाजपाने २० लाख नवे सदस्य तयार केले. २०१५ मध्ये भाजपचे ४० लाख सदस्य होते. आतातर अण्णा द्रमुख पक्षाशी युती करुन भाजपाने शड्डू ठोकला आहे. भाजपाचे आजवरचे राजकारण पाहिल्यास असे लक्षात येते की जेथे भाजपाची ताकद नाही तेथे थोडेसे झुकते माप घेत लहान भावाच्या रुपात प्रवेश करत भाजपा कधी मोठा भाऊ होवून जातो हे कुणालाच कळत नाही. याची महाराष्ट्र व बिहार ही दोन मोठी उदाहरणे आहेत. त्याआधी आसाममध्ये जेथे ८० च्या दशकापर्यंत तेथे जनसंघ किंवा भाजपचे अस्तित्व नव्हते. परंतु, भाजपने आसाम गणपरिषदेशी आघाडी करून या राज्यात आपली ओळख निर्माण केली. त्याचप्रमाणे त्रिपुरासारख्या छोट्याशा राज्यात मागील निवडणुकांमध्ये छोट्या-छोट्या पक्षांना सोबत घेऊन विजय संपादन केला आणि सरकार स्थापन केले. केंद्रात काँग्रेसचे सरकार असतानासुद्धा भाजप आणि जनता दल (युनायटेड) या पक्षांनी एकत्र येऊन २००५ आणि २०१० च्या निवडणुका मोठ्या फरकाने जिंकल्या होत्या. त्याचप्रमाणे कर्नाटकसारख्या दक्षिणेच्या प्रवेशद्वारावरील राज्यात भाजपने आपली ताकद अशाच पध्दतीने वाढविली आहे. 

२०२४ च्या दृष्टीने जुळवाजुळव 

आज दक्षिणेकडील राज्यांचा विचार करता तामिळनाडू वगळता अन्य राज्यांमध्ये भाजपची स्थिती तितकीशी कमजोर नाही. कर्नाटकात तर भाजप सत्तेत आहे. आंध्र प्रदेशात भाजप मुख्य विरोधी पक्षाची भूमिका बजावण्याच्या प्रयत्नांत आहे. तेलंगणामध्ये के. चंद्रशेखर राव यांच्याविरोधातील नाराजी वाढत आहे. त्याचवेळी या राज्यात भाजपने लोकसभेच्या चार जागा जिंकल्या होत्या. येथे तेलंगणा राष्ट्रीय समिती (टीआरएस) आणि काँग्रेस यांच्यात प्रामुख्याने तेथे लढत असे. गेल्या विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेसचे १९ पैकी १२ आमदार टीआरएसमध्ये सामील झाले. साहजिकच विरोधी पक्षाचा अवकाश भाजपसाठी खुला झाला आणि आता टीआरएसला पर्याय म्हणून स्वतःची प्रतिमा तयार करण्याच्या कामाला पक्षनेते लागले आहेत. आता तामिळनाडूमध्ये रजनीकांत यांचा राजकीय घोषणेमुळे सर्व वातावरण ढवळून निघाले आहे. तसे पाहिल्यास रजनीकांत गेल्या दोन वर्षांपासून राजकारणात सक्रीय आहेत. मात्र अधिकृतपणे त्यांनी राजकारणात प्रवेश केलेला नव्हता. गतवर्षी अभिनेता रजनीकांत आणि कमल हासन यांनी एकत्रित काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. यानंतर दोन्ही पक्ष युती करतील अशी शक्यता वर्तवली जात होती. रजनीकांत यांनी डिेसेंबर २०१७ मध्ये तामिळनाडूत राजकीय पक्ष स्थापन करत असल्याची घोषणा केली होती. जयललिता आणि करुणानिधी यांच्या निधनानंतर ही घोषणा करण्यात आली होती. मात्र लोकसभा ऩिवडणुकीत रजनीकांत यांनी सहभाग घेतला नव्हता. पण आता होणारी विधानसभा निवडणूक ते लढवू शकतात. यामुळे बिगूल वाजण्याआधीच तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत रंगत निर्माण झाली आहे. मात्र भाजपासाठी ही निवडणूक केवळ विधानसभेवर झेंडा फडकविण्यापुरता मर्यादित नसून ही सगळी जुळवाजुळव २०२४ च्या दृष्टीनेच केली जात असल्याचे स्पष्ट आहे.

Post a Comment

Designed By Blogger