जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या मतदारसंघातील पाणीटंचाईचा विषय अजून मार्गी लागलेला नाही. तालुक्यातील नेरी गावातील नागरिक तब्बल तीन वर्षांपासून पाणीटंचाईला तोंड देत आहेत. महिन्यातून केवळ दोन दिवस पाणीपुरवठा होत असल्याने महिलांच्या संयमाचा बांध सुटला आणि त्यांनी ग्रामपंचायत कार्यालयावर हंडा मोर्चा काढला. या ठिकाणी उत्तर देण्यासाठी सरपंच किंवा ग्रामसेवक नसल्याने संतप्त महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप ठोकले. सुमारे १० हजार लोकसंख्या असलेले नेरी हे जलसंपदामंत्री महाजन यांच्या मतदारसंघातील गाव आहे. १३ सदस्य असलेल्या या ग्रामपंचायतीत भाजपचे १२ सदस्य तर एकमेव राष्ट्रवादीच्या महिला सदस्या आहेत. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप खोडपे यांच्या पॅनलचे ग्रामपंचायतीत बहुमत आहे. मात्र तरीदेखील तीन वर्षांपासून या गावातील पाणी प्रश्न सुटलेला नाही. जामनेर तालुक्यात सद्य:स्थितीला ६८ गावांमध्ये टंचाईसदृश स्थिती आहे. सध्या मोहाडी, खर्चाने, रोटवद, सार्वे प्र.लो., लाखोली, मोरगाव, पळासखेडे वाघारी, तिघ्रे वडगाव, शंकरपुरा, सारगाव आदी ११ गावांना टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे तर जामनेर तालुक्यातील काळखेडे, कोदोली, नांद्रा प्र.लो, मोहाडी, रोटवद, सार्वे प्र.लो, लाखोली, मोरगाव, वाघारी, पळासखेडे प्र.न., तिघ्रे वडगाव, पाळधी, शंकरपुरा या गावांत खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. यामुळे तालुक्यात असंतोषाची धग वाढत आहे.
Post a Comment