आपण जेंव्हा फेमस लव्हस्टोरीज बद्दल बोलतो तेंव्हा आपसूकपणे रोमिओ-ज्युलिएट, हिर-रांझा, बाजीराव-मस्तानी, सलीम-अनारकली, सम्राट पृथ्वीराज चौहान-संयोगिता यांची नावे तोंडावर येतात व जेंव्हा जागतिक पातळीवरील आर्स्टिस्टबद्दल बोलतो तेंव्हा पिकासो, लिओनार्डो द विंची, क्लाऊड मोनेट, एम.एफ.हुसेन या नावांशिवाय ती चर्चा पूर्ण होत नाही. मात्र तुम्हाला जर कुणी सांगितले. या सर्वांपेक्षा एक मोठा आर्स्टिस्ट होता व त्याची प्रचंड हटके अशी लव्ह स्टोरी होती आणि हा व्यक्ती कुणी विदेशी नव्हे तर भारतीय होता व तो आपल्या जळगाव जिल्ह्यात राहत होता, तर तुमचा विश्वास बसेल का? होय, तुम्ही जे वाचलं ते अगदी खरं आहे. चाळीसगाव येथे राहून देश-परदेशांतल्या जवळजवळ ३०० राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांचे मानकरी ठरलेल्या केकी मूस यांच्या बद्दल आपण बोलतोयं. याचं निमित्त म्हणजे आज ३१ डिसेंबरला केकी मूस यांची पुण्यतिथी आहे.
या कलाकाराचं पूर्ण नाव कैकुश्रु माणिकजी मूस. त्यांची आई मात्र त्यांना लाडाने ‘केकी’ म्हणायची. नंतर हाच अवलिया कलाकार केकी जगासाठी कलामहर्षी केकी मूस झाला. चाळीसगाव स्टेशनच्या धुळे प्लॅटफॉर्मच्या बाजूलाच एक दगडी बंगला दिसतो. त्याचं नाव ‘रेब्रा स्ट्रीट’. ते केकींचं कलादालन. केकी यांचा मुंबईतल्या मलबार हिलसारख्या उच्चभ्रू लोकवस्तीत १९१२ मध्ये एका पारशी कुटूंबात जन्म झाला. त्यांचे मामा स्वातंत्र्यपूर्व काळातील नामवंत बिल्डर होते. त्यांचे नाव आर.सी.नरिमन. तत्कालिन व्ही.टी स्टेशन अर्थात आजचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ही त्यांनी बांधलेली वास्तू आहे. आपणा सर्वांना मुंबईचे नरिमन पॉईंट माहित आहेच. हे नाव त्यांचेच आहे. मुबंईच्या विल्सन महाविद्यालयात पदवीपर्यंत केकी यांचे शिक्षण झाले पुढील उच्च शिक्षण ते इंग्लंडला रवाना झाले. केकींनी १९३५ मध्ये लंडनमधील ‘द बेनेट कॉलेज ऑफ शेफिल्ड’मध्ये प्रवेश घेतला. केकींनी चार वर्षांत त्यांचा कमर्शियल आर्टचा डिप्लोमा पूर्ण केला. ‘द बेनेट कॉलेज ऑफ शेफिल्ड’ने फोटोग्राफीच्या जागतिक दर्जाच्या ज्या स्पर्धा त्या चार वर्षांत घेतल्या त्या स्पर्धांमध्ये केकींनी प्रथम येण्याचा बहुमान दोनदा मिळवला, अन् ते लंडनमध्ये असतानाच जगप्रसिद्ध छायाचित्रकार म्हणून नावारूपाला आले. केकींनी १९३८-१९३९ या वर्षभरात अमेरिका, ऑस्ट्रेलिया, फ्रान्स, जपान, ब्रिटन, इटली इत्यादी राष्ट्रांचा दौरा केला. त्यानंतर केकी १९३९ च्या डिसेंबर महिन्यात भारतात परत आले. दिल्लीवरून मुंबई आणि मुंबईवरून सरळ चाळीसगावी त्यांच्या बंगल्यात आले आणि त्यानंतर तब्बल पन्नास वर्षें, त्यांनी त्यांच्या बंगल्यात स्वत:ला आत्मकैद करुन घेत अखंड कलासाधना केली.
Post a Comment