खर्‍या अर्थाने अनलॉकपर्व

राज्यात येत्या ४ ऑक्टोबरपासून शाळा व सर्वधर्मीय प्रार्थनास्थळे सुरू करण्याचा निर्णय झाल्यानंतर आता २० ऑक्टोबरपासून सर्व महाविद्यालये सुरु करण्यात येत आहेत.  ज्या विद्यार्थ्यांचे लसीकरण पूर्ण झाले आहे, अशा विद्यार्थ्यांनाच महाविद्यालयात बोलवावे, अशा राज्य सरकारच्या स्पष्ट सूचना आहेत. यासह दिवाळीपूर्वी राज्य सरकारकडून कोरोनाचे एक-एक निर्बंध शिथिल होत असून आता राज्यातील रेस्टॉरंट, दुकाने उघडी ठेवण्यासाठीच्या वेळा वाढवून देण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या टास्क फोर्सच्या बैठकीत सोमवारी घेण्यात आला. मुंबईत हॉटेल, रेस्टॉरंट व दुकाने रात्री १२ पर्यंत उघडी ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. राज्याच्या इतर भागांतील वेळा स्थानिक प्रशासनाकडून निश्चित करण्यात येणार असल्याने दिवाळीपूर्वी बहुतेक सर्व निर्बंध शिथिल होणार आहेत. त्याआधी २२ ऑक्टोबरपासून राज्यातील चित्रपटगृह, नाट्यगृह सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे आता खर्‍या अर्थाने अनलॉकपर्व सुरु झाले आहे, असे म्हणता येईल. राज्यासह देशभरात कोरोनाचा प्रादूर्भाव कमी होत असल्याने सर्व बंधने उठवली जात आहे. मात्र कोरोना विरुध्दची लढाई अजूनही संपलेली नाही, याचे सर्वांनी भान ठेवायला हवे.



मानसिक संतुलन : सर्वांत अवघड काम

गेल्या २४ तासांत देशात कोरोनाचे १३,५९६ नवे रुग्ण आढळले. गेल्या २२१ दिवसांतील हे सर्वात कमी प्रमाण आहे. दुसर्‍या लाटेनंतर कोरोना उत्परिवर्तित झालेला नसून नवा व्हेरिएंटही आलेला नाही. त्यामुळे कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता कमी आहे. देशासह महाराष्ट्रातही विक्रमी वेगाने लसीकरण होत असल्याने कोरोनाच्या तिसर्‍या लाटेचा धोका टळण्याचे सकारात्मक चित्र दिसू लागले आहे. सध्यस्थितीत राज्यातील सर्व धार्मिक स्थळे आणि आठवी ते बारावीचे वर्ग सुरू झाले आहेत. राज्यातील महाविद्यालये २० ऑक्टोबरपासून सुरू होणार आहेत. चित्रपटगृहे, नाट्यगृहे, सभागृहे २२ ऑक्टोबरपासून खुली होणार आहेत. म्युझमेंट पार्क शुक्रवार, २२ ऑक्टोबरपासून खुले करण्यात येतील. मात्र, त्यातील वॉटर स्पोर्ट्स बंदच राहतील. पाण्याव्यतिरिक्त असलेल्या राईड्सचा आनंद घेता येणार आहे. हॉटेल, रेस्टॉरंट, दुकानांच्या वेळा कधीपासून वाढविणार याची तारीख जाहीर झालेली नाही. एक-दोन दिवसांत त्याच्या मार्गदर्शक सूचना जारी होतील. टास्क फोर्सच्या बैठकीनंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले की, कोरोना आटोक्यात असल्याने निर्बंध आणखी शिथिल करण्याची भूमिका घेण्यात आली आहे. दिवाळीनंतर १५ दिवसांनी त्यावेळच्या परिस्थितीचा आढावा टास्क फोर्स घेईल आणि निर्बंध नेहमीसाठी हटवायचे का, यावर पुन्हा एकदा विचारविनिमय करण्यात येईल. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने कमी होत असून, पॉझिटिव्हिटी दर कमी होत असल्याने एकप्रकारे दिलासा मिळाला आहे. राज्य सरकारने कोरोनाबाबत जिल्हावार आढावा घेऊन बिगिन अगेनचा नारा दिला आहे. एप्रिल आणि मे महिन्यास संपूर्ण देशात धुमाकूळ घालणारी, कोट्यवधी जणांना बाधित करणारी आणि लाखो जणांचा बळी घेणारी कोरोना विषाणूची दुसरी लाट आता बर्‍यापैकी ओसरल्याचे चित्र आहे. दहीहंडी, ईद, गणेशोत्सव, नवरात्री, दसर्‍यासारखे महत्वाचे सण पार पडल्यानंतरही ऑक्टोबर महिन्याच्या शेवटीला समोर आलेल्या कोरोनाच्या आकडेवारीमुळे संपूर्ण देशाला दिलासा मिळण्याची शक्यता दिसू लागली आहे. महाराष्ट्रातही अहमदनगर वगळता बहुतांश जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात दिसून येत आहे. आगामी काही दिवस आव्हाने कायम राहणार आहेत. मात्र राज्य सरकारच्या निर्णयानंतर आता शाळा महाविद्यालये गजबजणार आहेत. पण विद्यार्थी दीड वर्षाहून अधिक काळ घरात आहेत. शाळा, महाविद्यालये सुरु होणे आणि मोठ्या कालावधीनंतर शाळेत जाणे हा विद्यार्थ्यांसाठी आनंदाचा क्षण असला तरी मानसिक संतुलनाचा सर्वांत अवघड काम राहणार आहे. 

...तर तिसरी लाट आल्याशिवाय राहणार नाही

कोरोनाच्या या महामारीमुळे गेल्या दोन वर्षांपासून मुलांच्या शिक्षणावर परिणाम होत आहे. आतापर्यंत शाळा, महाविद्यालये बंद असल्याने मुले घरीच कोंडून होते. या काळात टीव्ही आणि मोबाइल एवढेच त्यांचे भावविश्व बनून राहिल्याने पालकांच्या चिंता वाढल्या आहेत. कोरोनाच्या पहिल्या आणि दुसर्‍यालाटेमुळे विद्यार्थ्यांना दोन वर्षांपासून घरी बसावे लागले असल्यामुळे शाळा, महाविद्यालये सुरु होणे ही विद्यार्थी आणि पालकांची मानसिक गरज झाली होती. आता राज्यात शाळा आणि महाविद्यालये सुरु होत असल्याने विद्यार्थी व पालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. मागील दीड वर्षाहून अधिकच्या काळात मुलांच्या खाण्याच्या, बसण्याच्या, शिस्तीच्या सवयीत बदल झाल्याने ते हळूहळू पूर्ववत होईल याकडे पालकांना लक्ष द्यावे लागणार आहे. मुलांना कोव्हिड-१९ लस दिलेली नसूनही; तसेच शाळा बंद ठेवूनही मुलांमध्ये लागणीचे, प्रतिपिंडे तयार होण्याचे प्रमाण जवळ जवळ प्रौढ लोकांइतकेच आढळले आहे. ही जमेची बाजू असली तरी तिसर्‍या लाटेची शक्यता असल्याने लहान, शालेय मुलांबाबत जास्त काळजी वाटणे साहजिक आहे. यामुळे आता सर्व शाळा, महाविद्यालये सुरु झाल्यानंतर विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यासारखे आशादायक चित्र जरी दिसत असले, तरी अजूनही धोका टळलेला नाही. पहिली लाट ओसरत असतांना लोकांनी मुक्त वातावरणात आपली कामे करण्यास सुरुवात केली. लोक काहींसे निर्धास्त झाल्यासारखे वागत होते. त्यांना मास्क वापरणे नकोसे वाटू लागले होते. पहिली लाट ओसरत असतांना जी चूक झाली तीच चूक आता पुन्हा व्हायला नको. मी लस घेतली आहे, आता मला कोरोनाची काय भीती? अशा आविर्भावात वावरणे निश्चितपणे धोकादायक आहे. आताही कोरोनाची दुसरी लाट ओसरण्यास सुरुवात झाली असली तरी कोरोनाचा धोका संपलेला नाही. उलट आपण जेवढे बेफिकिरपणे वागू तेवढा कोरोना आपल्या जास्त जवळ येणार आहे. देशात विक्रमी वेगाने लसीकरण होतेय, ही जमेची बाजू आहे. यामुळे कोरोनाविरुध्दच्या लढाईत मोठे यश मिळतांना दिसत असले तरी कोरोनाचा लढा अजून संपलेला नाही. ही लढाई दीर्घकालीन निश्चितच आहे, हे सर्वांनी लक्षात ठेवले पाहिजे. महाराष्ट्रात खरोखरच कोरानाचा आलेख खाली येत आहेत हे निश्चितच चांगले संकेत असून रुग्णसंख्या घटविण्यासाठी या स्थितीत जिल्हा आणि राज्य पातळीवर सातत्याने प्रयत्न करणे आवश्यक आहे. तरच कोरोनाला अटकाव करता येईल, आताही आपण गाफिल राहिलो तर तिसरी लाट आल्याशिवाय राहणार नाही. 

Post a Comment

Designed By Blogger