भारता विरोधातील छुपे युध्द

विशेष दर्जा देणारे ३७० कलम हटवून केंद्रशासित प्रदेश बनविण्याच्या निर्णयानंतर तुलनेने शांत भासणार्‍या जम्मू-काश्मीरमध्ये विशेषतः काश्मीर गेल्या काही दिवसांपासून दहशतवादाने पुन्हा डोके वर काढले आहे. यात प्रामुख्याने काश्मिरी पंडीतांसह आणि बिगर काश्मिरी नागरिकांचे वेचून हत्याकांड झाल्यामुळे पलायनही सुरू झाले आहे. यामुळे काश्मिरी पंडितांच्या पुनर्वसनावर दहशतीचे सावट असून विरोधकांनीही आक्रमकपणे सरकारच्या काश्मीर धोरणाला लक्ष्य केले आहे. आतापर्यंत सैनिकांवर आणि पोलिसांवर हल्ले होत होते. मात्र आता सामान्य माणसावर हल्ले व्हायला सुरुवात झाल्याचे चित्र या घटनेच्या निमित्ताने दिसून आले आहे. गेल्या काही महिन्यांपासून पाकिस्तानकडून ड्रोन पाठवून काश्मीरमध्ये घातपाती कारवाया करण्याचे डाव आखले जात होते. हे सर्व डाव भारतीय सैन्याने हाणून पाडले. त्यानंतरही कुठल्या ना कुठल्या मार्गाने अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे चित्र आहे. कलम ३७० रद्द करण्याच्या बेधडक केंद्रीय कृतीने धक्का बसलेले स्थानिक असंतुष्ट आधी दोन पावले मागे गेले. भारतीय सैनिकांच्या कणखर कारवाईने हिंसाचारातही घट झाली. अलीकडे मात्र सामान्य नागरिकांना लक्ष्य करून असंतोष उफाळून आणण्याची खेळी खेळली जात आहे. दहशतवाद्यांची ही खेळी प्रचंड घातक असून यामुळे काश्मीर पुन्हा एकदा अशांततेच्या मार्गावर दिसून येत आहे.



बिगर मुस्लिम आणि बिगर काश्मिरींना लक्ष्य

काश्मिरातील हिंसाचाराने पुन्हा डोके वर काढले आहे. श्रीनगर - जम्मू काश्मीरमधील दहशतवादी सामान्य लोकांना लक्ष्य करून दहशत पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत. विशेषतः बिगर मुस्लिम आणि बिगर काश्मिरींना लक्ष्य केले जात आहे. गोलगप्पा येथील विक्रेत्याची हत्या, उत्तर प्रदेशातील कारपेंटरांची हत्या, काश्मिरी पंडित आणि सुप्रसिद्ध केमिस्टची हत्या, महिला शाळेच्या मुख्याध्यापकाची हत्या, एका सामान्य शाळेतील शिक्षकाची हत्या आणि घरात घुसून दोन मजुरांची हत्या, या सर्व घटना पाकिस्तानच्या सांगण्यावरुन काम करणार्‍या दहशतवाद्यांनी केल्या. या हत्या अफगाणिस्तानात होत असलेल्या अत्याचाराची आठवण करून देत आहेत. जिथे इस्लामिक कट्टरतावादाच्या नावाखाली तालिबान कट्टरपंथी जिहाद आणि शरियात विश्वास नसलेल्यांना मारत आहेत. आणि काश्मीरमध्येही अशीच परिस्थिती निर्माण केली जात आहे. सुरक्षा दलांकडून वाढता दबाव आणि जनतेचा पाठिंबा कमी झाल्यामुळे, दहशतवादी आता त्यांची उपस्थिती सिद्ध करण्यासाठी निरपराधांचे रक्त सांडत आहेत. काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणावर अस्थिरता निर्माण करण्यासाठी मोठे षड्यंत्र रचले गेले आहे. या अंतर्गत सुमारे २०० लोकांना लक्ष्य करून त्यांची हत्या करण्याची तयारी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामध्ये सरकारशी जवळीक असणारे, माध्यम व्यक्ती, काश्मिरी पंडित आणि सुरक्षा दलांच्या संपर्कात असलेले लोक आहेत. बिगर मुस्लिम आणि बिगर काश्मिरींना लक्ष्य केले जात आहे. आयएसआयच्या सांगण्यावरून हा कट रचण्यात आल्याचे सांगितले जात आहे. आयएसआयने गेल्या दीड वर्षात अनेक नवीन संघटना निर्माण झाल्या आहेत. संघटना दहशतवाद्यांना सामान्य लोकांना लक्ष्य करण्याचे लक्ष्य देण्यात आले आहे जेणेकरून दहशत पसरली जाईल. आरएसएस आणि भाजपाशी संबंधित लोकांनाही लक्ष्य केले जात आहे. त्याचबरोबर इतर राज्यांच्या लोकांनाही विनाकारण लक्ष्य केले जात आहे. ३७० कलम हटविण्याच्या निर्णयानंतर केंद्राचे वेगवेगळ्या विभागांचे मंत्री नियमितपणे काश्मीरमध्ये जाऊन विकास कामांचा आढावा घेत आहे. परिवहन मंत्री नितीन गडकरी, कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर, श्रम तसेच वन आणि पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव, वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांचे अलीकडेच काश्मीर दौरे झाले आहेत. 

भारतालाही आता स्वत:ची रणणीती बदलावी लागेल

एकंदरीत गेल्या वर्षादिड वर्षात काश्मीर विकासाच्या प्रवाहात येतांना दिसत असल्याने पाकिस्तान समर्थक दहशतवाद्यांनी त्यांची रणणीती बदलल्याचे दिसते. मागील काही आठवड्यांपासून काश्मिरातील कामगारांच्या पद्धतशीर हत्या होत असल्याने, श्रमिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. हिंदू आणि बिगर काश्मिरी श्रमिकांचे घोळके रेल्वे-बस स्थानकांवर दिसत आहेत. एवढ्या संख्येतील स्थलांतर प्रथमच होत असल्याने चिंता वाढणे स्वाभाविक आहे. नि:शस्त्र नागरिकांना त्रास देऊन हुसकावून लावण्याचे अतिरेक्यांचे मनसुबे यशस्वी झाल्याने, काश्मीर खोर्‍यातील हिंदू अल्पसंख्याकांमध्ये दहशत आहे. अनेक श्रमिकांना सुरक्षित ठिकाणी पोहोचविण्यात पोलिसांनी मदत केली. गस्तही वाढविण्यात आली आहे. ऑक्टोबरच्या १८ दिवसांत अतिरेक्यांनी ११ नागरिकांची हत्या केली. अचानक वाढलेल्या या हल्ल्यांमागे पाकिस्तानचा हात आहे. कुलगाम जिल्ह्यात अतिरेक्यांनी घरात घुसून अंदाधुंद गोळीबार केला. त्यात दोन जणांचा मृत्यू झाला. जीव गेलेल्यांमध्ये हातावर पोट असलेल्या गरीब श्रमिकांचा समावेश असल्याने, हे भारताच्या विरोधातील छुपे युद्धच आहे. मागील अनेक वर्षांपासून रोजगार पुरविणारे काश्मीर खोरे आता आमच्या जिवावर उठले आहे. पोटापेक्षा कुटुंबाची चिंता असल्याने खोरे सोडण्याखेरीज पर्याय नसल्याचे मत परप्रांती श्रमिकांनी व्यक्त केले. वीटभट्ट्यांवर काम करणार्‍या काही श्रमिकांनी मालकाने पैसे दिले नसतानाही त्यांनी पलायनाचा मार्ग पत्करला. गैरकाश्मिरी हिंदूंना वेचून ठार करण्याची दहशतवाद्यांची ही कृती भयावह आहे. हे दहशतवाद्यांचे आव्हान कठोरपणाने मोडून काढावे लागेल. प्रसंगी पाकिस्तानलाही त्याच्या या चिथावणीची किंमत मोजायला लावायला हवी. जम्मू आणि काश्मीर येथील जनजीवन कधीही सुरळीत होऊ नये, तेथील हिंदू-मुस्लिमांतील तेढ वाढतच राहावी, असे दहशतवाद्यांना वाटते. त्यांचे हे मनसुबे यशस्वी होता कामा नयेत. तिथला दहशतवाद निपटणे, हीच कामगारांच्या सुरक्षेची हमी असेल. काश्मीरमधील कारवाया थांबल्या नाहीत, तर पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राईकसाठी तयार राहण्याचा इशारा केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी दिला होता. त्यानंतर पाकिस्तानने शांततेची भाषा सुरु केली होती. मात्र या हल्ल्यांच्या निमित्ताने पाकिस्तानने काश्मीरमध्ये उपद्रवी कारवाया सुरुच ठेवल्याचे सिद्ध होत आहे. यामुळे भारतालाही आता स्वत:ची रणणीती बदलावी लागेल.


Post a Comment

Designed By Blogger