दिव्यांग खेळाडूंची प्रेरणादायी कामगिरी

टोकियो पॅरालिम्पिक्सची रविवारी सांगता झाली. आजवरची ऐतिहासिक कामगिरी करत भारताने १९ पदके जिंकली. आतापर्यंत ५३ वर्षात भारताने ११ पॅरालिम्पिकमध्ये सर्व मिळून एकून १२ पदके जिंकली आहेत. मात्र यंदा भारताने टोकियो पॅरालिम्पिकमध्ये १९ पदके जिंकून वेगळाच विक्रम स्थापन केला आहे. टोकियो ऑलिंपिकमध्ये सात पदके मिळविल्यानंतर पॅरालिम्पिकमध्ये त्यापेक्षाही सरस कामगिरी भारतीय क्रीडापटूंनी करुन दाखविली आहे. शारीरिक व्यंगावर मात करत केलेली ही कामगिरी सर्वाथाने ऐतिहासिक व जिद्दीचे दर्शन घडविणारी आहे. यंदा अवनी लेखरा (नेमबाजी) - एक सुवर्ण व एक कांस्य पदक, सुमित अंतिल (भाला फेक) - सुवर्ण, मनीष नरवाल (नेमबाजी)- सुवर्ण, प्रमोद भगत(बॅडमिंटन) - सुवर्ण, कृष्णा नागर (बॅडमिंटन) - सुवर्ण, सिंहराज अधाना (नेमबाजी)- एक रजत आणि एक कांस्य पदक,  निषाद कुमार (उंच उडी) -  रजत, योगेश कथुनिया (थाळी फेक) - रजत, देवेंद्र झाझरिया (भाला फेंक) - रजत, मरिप्पन थंगावेलु (उंच उडी) - रजत, भाविना पटेल (टेबल टेनिस) - रजत, प्रवीण कुमार (उंच उडी) - रजत, सुहास यथिराज(बॅडमिंटन) - रजत, सुंदर गुर्जर (भाला फेक) - कांस्य, शरद कुमार (उंच उडी) - कांस्य, तिरंदाजी ः हरविंदर सिंह (धनुर्विद्या) - कांस्य,  मनोज सरकार (बॅडमिंटन) - कांस्य. यांनी टोकियोमध्ये तिरंगा फडकवला आहे. ‘तुमच्या मनाचं ऐका; कारण अपंगत्व मनात असते,’ अशा मंत्राच्या जोरावर अपंगत्वाला कधीच स्वतःच्या स्वप्नपूर्तीतला अडथळा होऊ देणार्या दिव्यांग खेळाडूंनी ऐतिहासिक कामगिरी नोंदवून देशाची मान उंचावली आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून देशासाठी पदक मिळवण्याच्या ध्येयाने झपाटलेल्या अनेक खेळाडूंची कहाणी सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे.


भारताची ही सर्वोत्तम कामगिरी 

ऑलिंपिकच्या धर्तीवर समांतर पातळीवर आयोजित होणारी स्पर्धा म्हणजे, पॅरालिंपिक. पॅरालिंपिक अर्थात पॅरलल(समांतर). या स्पर्धेत अपंगत्वानुसार पॅरालिंपिकपटू विविध खेळांमध्ये सहभागी होतात. पॅरालिंपिक स्पर्धेत दहा विविध अपंगत्व स्वरुपांचा विचार करण्यात येतो. याचे तीन उपप्रकार आहेत. फिजिअल इंपेअरमेंट (शारीरिक अपंगत्व), व्हिजन इंपेअरमेंट (दृष्टी अपंगत्व) आणि इंटलेक्च्युअल इंपेअरमेंट (बौद्धिक अपंगत्व). काही खेळ सर्व प्रकारच्या अपंगत्व असलेल्या खेळाडूंना खेळता येतात मात्र काही खेळ विशिष्ट अपंगत्व असलेल्या खेळाडूंसाठी राखीव असतात. आतापर्यंत झालेल्या स्पर्धांमध्ये भारतीय पॅरालिंपिकपटूंनी दमदारच कामगिरी केली आहे. मात्र यंदा सर्व विक्रम मोडीत निघाले आहेत. जपानची राजधानी टोकियोत पार पडलेल्या पॅरालिम्पिक २०२० क्रीडा स्पर्धेत भारताने इतिहास घडवला आहे. भारताने तब्बल १९ पदके मिळवली. पॅरालिम्पिकमधील भारताची ही सर्वोत्तम कामगिरी आहे. टोकियो पॅरालिम्पिक्समध्ये भारताचे आजवरचे सर्वात मोठे पथक गेले होते. ९ खेळांसाठी ५४ खेळाडू सहभागी होते. नेमबाजीतील सुवर्ण कामगिरी करणार्‍या १९ वर्षीय अवनी लेखराचा जीवन प्रवास अनेकांना प्रेरणादायी ठरेल असाच आहे. धोलपूरहून जयपूरकडे येत असताना संपूर्ण लेखरा कुटुंबीयांना अपघात झाला. त्यावेळी ११ वर्षांच्या असणार्‍या अवनीच्या मणक्याला दुखापत झाल्याने तिच्या कमरेखालील भाग लुळा पडला. त्यानंतर तिच्या संघर्षाची खरी पण वेदनामय कहाणी सुरू झाली. जयपूरच्या केंद्रीय विद्यालय तीनमध्ये शिकणारी अवनी खरे तर नृत्यसाधनेत तासन्तास रमायची. मात्र, अपघातानंतर सुरुवातीला आग्रा येथील उपचारानंतर ती जयपूरच्या एसएएस रुग्णालयात तीन महिन्यांपेक्षा अधिक काळ उपचार घेत होती. त्यानंतर दिल्लीतील इंडियन स्पायनल एन्ज्युरी सेंटरमध्ये आणखी चार महिने तिच्यावर उपचार सुरू होते. तिला स्वत:च्या पायावर उभे राहता यावे, यासाठी नाव समजेल अशा प्रत्येक रुग्णालयात तिचे कुटुंबीय तिला घेऊन चार वर्षे सलग दिल्ली, मुंबई आणि अहमदाबाद येथे धावत होते. या सार्या संघर्षाचा कळसाध्याय म्हणजे टोकियो पॅरालिम्पिकमध्ये १० मीटर रायफल स्टँडिंग प्रकारात मिळवलेले सुवर्णपदक. रौप्य पदक विजेच्या भाविना पटेलची कहाणी देखील तशीच आहे. जेमतेम वर्षाची असताना पोलिओने ग्रासल्याने भाविना पटेलला अपंगत्व आले. त्यानंतर दृष्टीहीन मुलांना टेबल टेनिस खेळताना पाहून तिला प्रेरणा मिळाली नि त्यातूनच तिला जगण्याचा मार्ग मिळाला. 

खेळाडूंनी देशाची मान उंचवली 

वयाच्या आठव्या वर्षी अपघातात उजवा हात गमावलेल्या निशाद कुमारने कोरोनावर मात करीत उंच उडीत घेतलेली झेपही अशीच एक नंबरी. हरियाणातील सोनिपतच्या सुमित अंतिलच्या सुवर्णफेकीचे कौतुक करावे तितके थोडेच. २०१५ मध्ये एका मोटारसायकल अपघातात त्याने गुडघ्याच्या खालचा पायाचा भाग गमावला. त्यामुळे कुस्तीपटू बनायचे स्वप्न भंगले खरे. तरी त्यातूनही न डगमगता भालाफेकीत भारताचा हा शिलेदार नवा इतिहास घडविला. ऑलिंपिकमध्ये नीरज चोप्रा याने सुवर्णयश मिळविल्यानंतर त्याच्या पावलावर पाऊल टाकत सुमितने हे विश्वविक्रमी लक्ष्य साधले व त्यापाठोपाठ देवेंद्र झांझरिया आणि सुंदरसिंग गुर्जरने अनुक्रमे रौप्य व कांस्यवर नाव कोरले. भालाफेकीसाठी ताकद तसेच शारीरिक व मानसिक संतुलन या दोन्ही गोष्टी महत्त्वपूर्ण असतात. या खेळाडूंनी ते दाखवून दिले. कास्य पदक जिंकणार्‍या उत्तराखंडच्या मनोज सरकारने अतिशय कठीण आणि गरीबीतून पॅरालिम्पिकपर्यंतचा प्रवास केला. दीड वर्षाचा असताना त्याला ताप आला होता. आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने मनोजवर योग्य उपचार झाले नाहीत. खराब उपचारादरम्यान औषध घेतल्यानंतर त्याचा पाय कमकूवत झाला. घराची परिस्थिती इतकी खराब होती की तो सुट्टीच्या दिवशी आई-वडिलांसोबत कामावर जात असे. लोकांना बॅडमिंटन खेळताना पाहून मनोजने घरच्यांकडून रॅकेटची मागणी केली. पण त्यासाठी पैसे नव्हते. मनोजच्या आईने सांगितले की, त्यांनी शेतात काम करून पैसे जमा केले आणि मनोजसाठी रॅकेट विकत घेतली. आणि त्याच मनोजने पॅरालिंम्पिकमध्ये पदक पटकावून स्वत:ला सिध्द केले. आयएएस अधिकारी असणार्‍या सुहास यथिराज यांनी रौप्य पदक जिंकत इतिहास रचला आहे. सुहास यथिराज पदक जिंकणारे पहिला आयएएस अधिकारी ठरले आहेत. कर्नाटकमध्ये जन्म झालेला सुहास यथिराज उत्तर प्रदेशातील नोएडा येथे जिल्हा दंडाधिकारी म्हणून कार्यरत आहे. नेमबाज सिंहराज अधाना याने पुरुषांच्या १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात कांस्यपदक पटकावत साधलेला लक्ष्यभेदही आश्वासक. ज्या प्रतिकूल स्थितीत त्याने येथवर मजल मारली, तो प्रवास थक्क करणाराच ठरतो. थाळीफेकीत  भारताच्या खात्यात रौप्यपदकाची नोंद करणार्‍या योगेश कथुनिया याने अर्धांगवायूसारख्या आजारावर मात करीत मारलेली मुसंडी हीदेखील अफलातून. याआधी झालेले ऑलिंपिक व आताचे पॅरालिंपिक दोन्ही स्पर्धांमध्ये दमदार कामगिरी करुन आपल्या खेळाडूंनी देशाची मान उंचवली आहे.    

Post a Comment

Designed By Blogger