बलुचिस्तान : भारताची सर्वोकृष्ट कुटनिती

गेल्या ५० दिवसांपासून काश्मीर खोरे धुसफुसत आहे. आतंकवादी बुर्‍हान वनीला कंठस्नान घातल्यानंतर काश्मीरमध्ये हिंसाचार थांबायचे नाव घेत नाही. आठ-आठ तासांच्या शिफ्टमध्ये (दगडफेक करणारे पगारी नोकरदार असल्याचे नुकतेच समोर आले आहे) होणारी दगडफेक...जाळपोळ...पाकिस्तानचे फडकणारे ध्वज... भारत विरोधी घोषणा...हे आता नवे राहिलेले नाही. याआधीही तिरंगा जाळण्याच्या घटनाही या भागात झाल्या आहेत. काश्मीर प्रश्‍नावर गेल्या ७० वर्षांपासून भारत लढा देत आहे. मात्र वाकडी शेपूट असलेला पाकिस्तान काश्मीरवर दावा करत नेहमीच वातावरण चिघळवित आहे. इतक्या वर्षांच्या या संघर्षाला बलुचिस्तानच्या निमित्ताने प्रथमच कलाटणी मिळाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकाच झटक्यात पाकिस्तानला बचावाच्या अवस्थेत आणले आहे. एवढेच नाही तर त्यांनी बलुचिस्तानच्या रूपाने काश्मीरपेक्षा मोठा मुद्दा अस्तित्वात असून त्याच्यावर तोडगा निघणे बाकी आहे, ही बाब आंतरराष्ट्रीय पातळीवर जोरदारपणे मांडली आहे. भारताच्या या नव्या रणनितीमुळे जो पाकिस्तान काश्मीरवर हक्क सांगत होता तो आता बलुचिस्तान वाचविण्यासाठी धडपडतांना दिसत आहे! भारताच्या भुमीवर पाकिस्तानचे ध्वज फडकतांना पाहूून खुश होणार्‍या ‘शरिफ’ बेईमानांना बलुस्तानमध्ये डौलाने फडकणारा भारताचा तिरंगा व नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र पाहून धडकी भरली आहे. ही आजवरची सर्वोकृष्ट कुटनिती मानली जात आहे. आधीच १९७१ मधील बांगलादेशाची जखम ताजी असतांना बहुचिस्तान ही पाकची दुखरी नस दाबण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यशस्वी झाले आहेत.

या सर्व घडामोडींच्या पार्श्‍वभुमीवर इतिहासात डोकावणे महत्वाचे ठरेल. सध्याचे बलूचिस्तान म्हणजे अखंड भारतातील मीर अहमद यांचे ‘कलात’ संस्थान होय. फाळणीच्या वेळी तेथे ब्रिटिशांच्या आधिपत्य होते. ‘कलात’ ने पाकिस्तानात सामील होण्यास नकार दिल्यानंतर. मार्च १९४८ मध्ये पाकने लष्कर पाठवून विलीनीकरणाच्या करारावर तत्कालीन शासक यार खानची सही घेतली होती, पण त्यांच्या भावांनी संघर्ष सुरूच ठेवला होता. सध्याच्या बलूच आंदोलनाची मुळे तेव्हांपासूनची आहेत. ती १९६६ मध्ये अधिकच घट्ट झाली. भौगोलिकदृष्ट्याही बलुचिस्तानला प्रचंड महत्व आहे कारण पाकिस्तानच्या ४४ टक्के भागात पसरलेल्या बलुचिस्तानची लोकसंख्या तब्बल १३ लाख इतकी आहे. या बलुचिस्तानचा भारताशी विशेषत: महाराष्ट्राशी फार जुना संबध आहे. दुसर्‍या पानिपतच्या युध्दानंतर अहमदशहा अब्दाली अफगणिस्तानला जाण्यासाठी निघाल्यानंतर त्याने सोबत २२ हजार मराठी युध्दकैदींना सोबत घेतले होते. वाटेत लागणार्‍या बलुचिस्तानच्या डेरा बुगटी प्रांताच्या शासकांना अनेक मराठा युध्दकैदी सोपविण्यात आल्याची इतीहासात नोंद आहे. यावेळी मीर नासीर खान या शासकाने मराठा युद्धकैदींना काल्पर, मसोरी, शांबानी, नोथानी, पिरोजानी आणि रहेजा या बुगटी जमातींमध्ये विभागून दिले होते आजही हा समाज काल्पर मराठा, नोथानी मराठा, शांबानी मराठा या बुगटी जमातीच्या नावाने ओळखला जातो.

बलुचिस्तानच्या मुद्यावरुन पाकिस्तानचा एवढा तिळपापड होण्याचे दुसरे कारण म्हणजे, बलुचिस्तानमध्ये गॅस, युरेनियम, तांबे, सोने आणि इतर धातूंचा मोठा साठा आहे. त्याच्या वायू साठ्यांतून अर्ध्या पाकिस्तानची गरज भागते. मध्य आशियात प्रवेशासाठी चीन ज्या ग्वादर बंदराची निर्मिती करत आहे ते येथेच आहे. इराण-पाकिस्तान गॅस पाइपलाइनही येथूनच जाते. शांतता असली तरच हे प्रकल्प शक्य आहेत. बलुचिस्तान प्रांतातल्या ग्वादार बंदराच्या विकासासाठी पाकिस्तानने चीनशी करार केल्यामुळे भारताच्या बंगालच्या उपसागरातल्या वर्चस्वाला धोका निर्माण झाला असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चाबहार बंदराचा विकास करण्यासह तेथून अफगाणिस्तान आणि मध्य आशियापर्यंत रस्ते आणि रेल्वे मार्ग बांधण्याच्या करारावर स्वाक्षरी केली. या प्रकल्पासाठी भारत ५०० दशलक्ष डॉलर्सची मदत करणार आहे. हा देखील एका कुटनितीचा भाग आहे. भारताचे हे आक्रमक डावपेच आपल्याला परवडणार नाहीत. याची जाण पाकिस्तानला आहे. चहूबाजूने होणार्‍या कोंडीमुळे पाकिस्तानला धडकी भरली आहे. यामुळे दिवा विझण्यापुर्वी जसा वात जास्त फडफडते तशीची अवस्था पाकिस्तानची झाली आहे.


Post a Comment

Designed By Blogger