सिध्दूंची सरशी!

भाषेवरील प्रभुत्व आणि खिळवून ठेवणारी वक्तृत्वशैली असणारे लोकप्रिय नेते नवज्योत सिंग सिध्दू आणि देशात ‘मोदी लाट’ असतानाही २०१७ मध्ये स्वबळावर अकाली दल आणि भाजपला नमवून पंजाबमध्ये सत्तापरिवर्तन करणारे पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्यातील वाद काँग्रेसची मोठी डोकंदूखी ठरत आहे. पंजाबमध्ये विधानसभेच्या निवडणुका जवळ आल्या असल्याने पक्षाला एकसंध ठेवण्यासाठी दिल्लीतील नेते कुणाच्या पारड्यात झुकते माप टाकता, याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. काँग्रेस नेतृत्वाला अमिरदर सिंग यांच्या क्षमतेची जाणीव असल्याने त्यांना नाराज करणे परवडणारे नव्हेत तर सिद्धू यांची लोकप्रियता जास्त असल्याने पक्ष नेतृत्वालाही त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे अवघड बनले होते. आता पक्षश्रेष्ठींनी सिंध्दू यांना पंजाबचे प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्त केले आहे. सिद्धू यांच्यासह संगतसिंग, सुखविंदरसिंग, पवन गोएल, कुलजितसिंग यांची कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. या नियुक्तीने पंजाब काँग्रेसमधील तुल्यबळ नेत्यांच्या कुरघोडीच्या राजकारणात सिध्दूंनी बाजी मारली आहे.



मुख्यमंत्रीआणि सिद्धू यांच्यात गेल्या काही महिन्यांपासून बेबनाव

पंजाब राज्यात पुढील वर्षी होणार्‍या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. एके काळी एकत्र संसार करणार्‍या अकाली दल आणि भाजपचा आता काडीमोड झाला असला, तरी या पक्षांनी या राज्यातील सत्ता मिळवण्यासाठी आतापासूनच प्रयत्न करायला सुरुवात केल्याचे दिसते. विशेष म्हणजे, या राज्यात सत्तारूढ असलेल्या काँग्रेसमध्ये मात्र उघडपणे वादनाट्य रंगले आहे. पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमिरदर सिंग आणि काँग्रेसनेते नवज्योतसिंग सिद्धू यांच्यात गेल्या काही महिन्यांपासून बेबनाव आहे. काँग्रेसमधील हे दोन्ही बडे नेते एकमेकांवर यथेच्छ चिखलफेक करत असून विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसमधील अंतर्गत वाद मिटवण्याचे मोठे आव्हान काँग्रेस नेतृत्वापुढे आहे. सिध्दू जेवढे लोकप्रिय तेवढेच वादग्रस्त नेते म्हणून परिचित आहेत. इम्रान खान यांनी पाकिस्तानच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली तेंव्हा या शपथविधी सोहळ्यात सिद्धू हे सुद्धा उपस्थित होते. सिद्धू शपथविधीसाठी पाकिस्तानात गेल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यातच नवज्योत सिंग सिद्धू यांनी पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांची गळाभेट घेतली. इतकचे नाही तर, पाकव्याप्त काश्मीरच्या अध्यक्षांच्या बाजुला नवज्योत सिंग सिद्धू बसल्याचे पहायला मिळाले. यामुळे मोठा वाद उफाळला होता. सिध्दू २००४ आणि २००९ च्या लोकसभा निवडणुकांत अमृतसरमधून भाजपच्या तिकिटावर ते निवडूनही आले. मात्र २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने तिकीट नाकारल्याने नाराज सिद्धू आधी आम आदमी पक्षाकडे आणि नंतर काँग्रेसकडे वळले. २०१७ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर मुख्यमंत्री अमरिंदर सिंग आणि सिद्धू यांच्यात वेळोवेळी खटके उडू लागले होतेच; आता या दोघांतील वाद विकोपाला गेला आहे. मागच्या काही दिवसांपासून दोघं नेते एकमेकांवर जाहीर टीका करत आहेत. काँग्रेसमधील अंतर्गत धूसफूस कमी होण्यापेक्षा दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. पंजाबमध्ये २०१७च्या विधानसभा निवडणुकीवेळी भाजपमधून काँग्रेसमध्ये दाखल झाले तेव्हापासून विविध आमदार, खासदारांचा पाठिंबा मिळविण्याचा त्यांनी प्रयत्न केला. 

अमरिंदर यांच्या विरोधानंतरही सिद्धू यांच्या गळ्यात प्रदेशाध्यक्षपदाची माळ

सरकारमध्ये मोठी जबाबदारी, म्हणजेच उपमुख्यमंत्रिपद तरी मिळावे ही सिद्धू यांची मनीषा लपून राहिलेली नाही. २०१७ मध्ये मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांनी सिद्धू यांच्याकडून स्थानिक प्रशासन, पर्यटन आणि सांस्कृतिक मंत्रालयाचा कार्यभार काढून घेतला होता. त्यानंतर १० जून रोजी नवज्योत सिंह सिद्धू यांनी तत्कालीन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेऊन थेट आपला राजीनामा सादर केला होता. तसंच त्यावेळी त्यांना पंजाबमधील राजकीय परिस्थितीबाबत देखील माहिती दिली होती. पण याबाबत फार काही मोठे निर्णय पक्ष पातळीवर घेतले गेले नाही. सिद्धू यांचा राजीनामा जवळजवळ महिनाभर मंजूर करण्यात आला नव्हता. आताही गत काही दिवसांपासून अमरिंदर सिंग आणि सिध्दू यांच्यातील सातत्याने उफाळून येत आहे. कारण ते काँग्रेसमधील जुनेजाणते नेते आहेत. अमरिंदर सिंग यांच्या काही जमेच्या बाजू असल्याने त्यांना दूर करण्याचा प्रयत्न सध्या तरी काँग्रेस नेतृत्वाला शक्य नव्हते. स्वत:च्या क्षमतेवर निवडून येण्याची ताकद त्यांच्यात आहे. ‘मोदी लाट’ असतानाही आणि अनेक राज्यांत ‘भगवे’ झेंडे फडकले असतानाही २०१७ मध्ये अमिरदर सिंग यांनी स्वबळावर अकाली दल आणि भाजपला नमवून पंजाबमध्ये सत्तापरिवर्तन केले. काँग्रेस नेतृत्वाला अमिरदर सिंग यांच्या क्षमतेची जाणीव असल्याने त्यांची नाराजी ओढवून घेतली जाईल ही शक्यता धूसर मानली जात होती. दुसरीकडे सिध्दू ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. यामुळे सोनिया गांधी काय निर्णय घेतात? याकडे अनेकांचे लक्ष लागून होते. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी रविवारी नवज्योत सिंह सिद्धू यांना पंजाबचे प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्त केले. अमरिंदर सिंह यांचा आक्षेप असूनही पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांनी हा निर्णय घेतला आहे. अमरिंदर यांच्या विरोधानंतरही सिद्धू यांच्या गळ्यात प्रदेशाध्यक्षपदाची माळ पडल्याने काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची मर्जी त्यांनी संपादित केल्याचे दिसत आहे. मात्र या निर्णयामुळे अमरिंदर सिंग दुखावलेलेच आहेत. त्यांची ही नाराजी काँग्रेसला परवडणारी नाही. आधी काँग्रेसच्या हाती जेमतेम दोन-तिन राज्य आहे त्यातही अशी परिस्थिती असल्यास पक्ष कसा वाढू शकतो? याचा विचार श्रेष्ठींनी करणे आवश्यक आहे. सिध्दू यांची सरशी झाली असली तरी अमरिंदर यांच्या ऐवढी त्यांची राजकीय ताकद नाही यामुळे श्रेष्ठींनी नेमके कोणते गणित आखले असावे? हे समजण्या पलीकडचे आहे. याचा काँग्रेसला फायदा होतो का नुकसान? या प्रश्नचे उत्तर विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतरच मिळेल.






Post a Comment

Designed By Blogger