भाजपाला खडसे नको मात्र त्यांचे नाव हवे


भ्रष्ट्राचाराच्या विविध आरोपांच्या भोवर्‍यात अडकलेले भाजपाचे ज्येष्ठनेते तथा माजी महसुल मंत्री आमदार एकनाथराव खडसे भाजपापासून हातचे अंतर ठेवून आहेत. त्यांचा हा दुरावा गेल्या सहा महिन्यांपासून हळूहळू वाढत आहे. भाजपात महाजन-खडसे गट असतांना नेतेच काय पण कार्यकर्तेही उघडपणे बोलायला तयार नव्हते (संघ शिस्त) मात्र भाजपाच्या बैठकांमध्ये या विषयावरुन कार्यकर्त्यांमध्ये उघडपणे वाद झाल्यानंतर, हा विषय कार्यकर्तेही उघडपणे बोलायला लागले आहेत. ज्या नाथाभाऊंमुळेे पक्ष केवळ जिल्ह्यातच नव्हे तर संपुर्ण राज्यात वाढला त्यांच्यावर अन्याय झाला असून यात मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय मानले जाणारे जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांचाही सहभाग आहे, अशी भावना खडसे समर्थक कार्यकर्त्यांच्या मनात घर करुन आहे. यास वेळोवेळी खतपाणी घालण्याचे काम भाजपामधीलच काही मंडळी सोईस्कररित्या करत असतात. यामुळे खडसे-महाजन यांच्यातील दुरावा वाढत आहे. मात्र दोन्ही ज्येष्ठ नेते हा विषय कधीही मान्य (जाहीररित्या) करत नाही. मात्र एकमेकांपासून लांब राहणे पसंत करतात, ही वस्तुस्थिती भाजपा कार्यकर्तेेही मान्य करु लागले आहेत. नुकत्याच पार पडलेल्या जळगाव जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांदरम्यान इच्छुकांच्या मुलाखतीवेळी खडसे वैद्यकिय कारणास्तव मुंबईत होते. मुलाखती, तिकीट वाटप अन्य सर्व जबाबदार्‍या महाजन यांनी सांभाळल्या. यानंतर जिल्ह्यात परतल्यानंतरही खडसे निवडणूकिपासून अलिप्तच राहीले. दोन-तिन अपवाद वगळता त्यांनी त्यांच्या विधानसभा मतदारसंघा व्यतिरिक्त कोठेही सभा घेतल्या नाहीत. मात्र खडसे यांना मानणारा जिल्ह्यात मोठा वर्ग आहे याची जाणीव पक्षाला असल्याने त्यांच्या नावाचा सफाईदारपणे वापर करण्यात आला.

जळगाव जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची धुरा सांभाळणारे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी जिल्ह्यातील प्रत्येक प्रचारसभेत बोलतांना नाथाभाऊ आमचे नेते असून ते लवकरच मंत्रीमंडळात परततील. तो पर्यंत मी काळजीवाहू पालकमंत्री असल्याचे सांगत प्रचंड टाळ्या मिळवल्या. मुख्यमंत्री देवेेंद्र फडणीवीस यांच्या जिल्ह्यातील एकमेव सभेत खडसेंचे भाषण होवू न देण्याची खेळी सफाईदारपणे खेळल्यानंतरही मुख्यमंत्र्यांना खडसेंच्या नावाचा वापर करुनच टाळ्या मिळवता आल्या. खडसेंनी मंत्रीपदाच्या काळात घेतलेल्या निर्णयांमुळे जिल्ह्याचा कसा विकास झाला, याचे दाखले मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या भाषणात दिले. जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी त्यांच्या जामनेर वगळता अन्य भाषणात खडसेंच्या नावाचा पुरेपुर वापर करत महाजन-खडसे अशी गटबाजी नसल्याचा दावा केला. यंदा जिल्हा परिषदेत भाजपाची एकहाती सत्ता आल्यास खडसे पुन्हा मंत्रीमंडळात परततील, असा प्रचार देखील भाजपातील एका गटामार्फत सोईस्कररित्या करण्यात येत होता. यामुळे भाजपाला खडसे नको असले तरी त्यांचे नाव ब्रॅण्डनेम म्हणून हवे असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे राज्यातील महापालिका व जिल्हा परिषदांच्या धामधुमीनंतर खडसेंची मंत्रीमंडळ वापसी होते का? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

Post a Comment

Designed By Blogger