पांढर्‍या दूधाचा ‘काळा’ बाजार

दूध उत्पादनात तुट असलेला देश ते जगातील सर्वाधिक दूध उत्पादन करणारा देश हे भारताचे स्थित्यंतर वर्गीस कुरियन यांनी घडवून आणलेल्या दूध क्रांतीमुळे प्रत्यक्षात उतरले. दूध उत्पादन वाढविण्यासाठी राबविण्यात आलेल्या ऑपरेशन फ्लड मुळे देशात धवल क्रांती घडली व त्यानंतर अमूल हा डेअरी उत्पादनांचा ब्रँड एका खेड्यापासून संपुर्ण देशात पोहचला. धवल क्रांतीची ही लाट खान्देशात व विशेषत: जळगाव जिल्ह्यात यायला वेळ लागला नाही. ८० च्या दशकात जळगाव जिल्ह्याचे दूध थेट बॉम्बेला (आताचे मुंबई) जावू लागल्याने जळगावच्या दूध उत्पादकांचा संपुर्ण राज्यात दबदबा निर्माण होऊ लागला. यात पाचोरा व चाळीसगावचा वाटा मोठा होता. जिल्ह्याचे दूध चाळीसगाव मार्गे मुंबईला पोहचल्याने सुवर्णनगरी अशी ओळख असलेल्या जळगावला दूधाची पंढरी म्हणून नवी ओळख मिळाली. या काळातही दूध भेसळीचे प्रकार समोर आल्यानंतरही सुमारे २०-२५ वर्ष ही मोनोपली कायम होती. मात्र साधरणत: सन २००२ पासून या व्यवसायावर पश्‍चिम महाराष्ट्राने पकड निर्माण करण्यास सुरूवात केली. आजमितीस जिल्ह्यात बोटवर मोजण्याइतक्याही डेअरींचे दूध मुंबईला पोहचत नाही हे कटू सत्य आहे. आपल्या मागून आलेल्या पश्‍चिम महाराष्ट्राने आज संपुर्ण राज्याच्या दूधाच्या बाजारपेठेवर कसा कब्जा मिळवला? या प्रश्‍नाचे उत्तर सर्वसामान्य ग्राहकांना गेल्या आठवड्यात अन्न व औषध प्रशासन विभाग्याच्या कारवाईनंतर मिळाले.

जळगाव जिल्ह्यात दूधात भेसळ होत असल्याच्या तक्रारींवरून मुबंई येथील अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने १८ नोव्हेंवरला ११ दूध डेअरींवर छापा मारून नमुने तपासणीसाठी मुंबई येथे पाठविले होते. या घटनेपर्यंत तरी ही नियमित तपासणी आहे असे चित्र भासविण्यात येते होते. मात्र २४ नोव्हेंबरला तपासणी अहवाल प्राप्त झाला यात जळगाव जिल्हा दूध संघासह सर्वच डेअरींमधील दूध अप्रमाणित व पिण्यास अयोग्य आहे, असा ठपका ठेवल्याने दूध भेसळीचा भांडाफोड झाला. अहवालानुसार, जिल्ह्यात पुरविले जात असलेल्या दूधात मिल्क फॅट कमी असून स्किम्ड मिल्क पावडर व साखरदेखील मिसळण्यात आली आहे, असा ठपका ठेवल्यामुळे दूधाचा काळबाजार करणार्‍यांपैकी आठ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील कारवाई सुरू करण्यात आली आहे. यात निकाल जो लागेल तो लागेलच मात्र मुंबईच्या मार्केट मध्ये आपण विश्‍वास गमावला तो कधी परत येणार नाही, हे सत्य कोणीही नाकारू शकत नाही.

आजमितीस जिल्ह्यात दररोज सुमारे ७ लाख लिटर दूधाचे उत्पादन होते. यात सर्वाधिक वाटा जळगाव जिल्हा दूध उत्पादक संघाचा आहे त्यापाठोपाठ चाळीसगाव, पाचोरा, जळगाव तालुका, पारोळा या तालुक्यांमध्येही मोठ्या प्रमाणात खाजगी दूध संकलन होते. शासन दप्तरी असलेल्या माहितीनुसार जिल्हाभरात ७८७ दूध उत्पादक संस्था कार्यरत असून त्यांच्या माध्यमातून दररोज हजारो लिटर दूध संकलित केले जाते. या दूधाचा फॅट तपासून त्याचा मोबदला उत्पादकाला दिला जातो. ज्या दूधचा फॅट जास्त त्याला जास्त भाव मिळतो, यामुळे फॅट वाढविण्यासाठी  दूधात साखर किंवा मिल्क पावडर मिसळली जाते. वैद्यकीय तज्ञांच्या मते भेसळयुक्त दुध पिल्याने मधुमेह झालेल्या रूग्णांची साखर वाढते. याव्यतिरिक्त पावडर किंवा अन्य रासायनिक द्रव्ये मिसळलेले दूध पिल्याने आतड्यांना सुज येणे, पोट बिघडणे, लिव्हरला सुज येणे यासारखे आजार होण्याची संभावणा असते. यातही गंभीर परिणाम म्हणजे गायी-म्हशींना जास्त दूध येण्यासाठी ऑक्सिटॉक्सीन नावाचे इंजेक्शन दिले जाते हे दूध पिल्याने लहान बालके व मुलींच्या शरिरातील हार्मोन्समध्ये देखील बदल होण्याची मोठी शक्यता असते. यामुळे अश्या प्रकारची भेसळ करणार्‍यांवर अन्न सुरक्षा आणि मानके कायदा २००६ चे नियमन आणि विनियमन २०११ नुसार कलम ४९ ते ६४ प्रमाणे ६ महिने ते ७ वर्षांपर्यंत शिक्षा व  ३ लाख ते १० लाखांपर्यंत दंडाची तरतुद आहे.

जिल्ह्याचा आर्थिक कणा मोडला!

जसे आधी उल्लेख केल्याप्रमाणे दूध भेसळीच्या या गोरखधंद्यात ज्यांच्यावर जी कारवाई व्हायची ती होईलच मात्र जास्त नफ्यासाठी भेसळ माफियांनी जिल्ह्याची पत मातीत मिसळली आहे. या कारवाईनंतर थोड्या दिवसांनी सर्वसामान्य ग्राहक झाले गेले ते गंगेला मिळाले धोरण स्विकारत ‘विकास’ स्विकारतील मात्र जिल्ह्याच्या दूधाला मुंबईच्या बाजारपेठेत तेच मानाचे स्थान राहिल का? याचेही आत्मपरिक्षण करणे गरजेचे आहे. जलगॉंव स्पेशल या बॅ्रंण्डनेमने कमावलेला विश्‍वास मुंबई मार्केट मधून गमावला तर आपल्या दूधाला किंमत उरणार नाही. परिणामी यामुळे होणारे नुकसान सर्वसामान्य दूध उत्पादकाच भोगावे लागेल, हे देखील लक्षात ठेवायला हवे. आज आपल्या मागून आलेल्या  पश्‍चिम महाराष्ट्राने या व्यवसायात केवळ दर्जा टिकवून ठेवत केवळ विश्‍वासहार्यता टिकवून न ठेवता दबदबाही निर्माण केला. यामुळेच तेथील शेतकरी सधन शेतकरी म्हणून ओळखले जातात. दूध भेसळीच्या या प्रकरणांवरून आपण आज धडा घेतला नाही तर पुढच्या पिढीला गंभीर परिणाम भोगावे लागतील हे मात्र काळ्या दगडावरची रेष आहे!

अशी ओळखावी दूधातील भेसळ 

शुध्द दूध तापवल्यानंतरही पांढरेच राहते मात्र भेसळयुक्त दूध पिवळे पडते, शुध्द दूधाचा रंग बदलत नाही मात्र भेसळयुक्त दूध ४-५ तासानंतर पिवळे पडते, युरियाची भेसळ असलेल्या दूधात सोयाबीन टाकून तांबडा लिटमस बुडवल्यास तो निळा होतो, दूधात साबणाची किंवा डिटर्जंटची भेसळ असल्याही तांबडा लिटमस निळा होतो, पिठाची भेसळ ओळखण्यासाठी दूधात आयोडींनचे थेंब टाकल्यास दूध निळे होते.

1 comment :

  1. युवराजसिंग यांची प्रसायमाध्यमातील ओळख सातत्याने वाढत आहे.... समाजाचं भलं व्हावं... राज्य व देशाच्या प्रगतीत लोकशाहीच्या चौथ्या खांबाच्या मजबुत आधारस्तंभातील युवराजसिंग एक महत्वपुर्ण घटक.. ते आपले स्थान व भुमिका अधिकृ भक्कम व जबाबदारीने निभावतील यची खात्री आहे...

    ReplyDelete

Designed By Blogger