ऑलम्पिक दर्जाचे खेळाडू तयार करण्याचे स्वप्न

जळगावच्या मातीने अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरचे खेळाडू दिले आहेत. या मौल्यवान हिर्‍यांना योग्य पैलू पाडण्यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या प्रशिक्षकांची कायमस्वरुपी नियुक्ती करण्याचे उद्दीष्ट आम्ही ठरविले आहे. जेणेकरुन ऑलम्पिक दर्जाचे खेळाडू तयार होतील, अशा विश्वास जैन उद्योग समुहाचे अध्यक्ष अशोकभाऊ जैन यांनी व्यक्त केला.  

सर्व खेळाडूंना राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या शुभेच्छा देतांना अशोकभाऊ म्हणाले की, आपल्या जळगाव जिल्ह्यातील लंघडीपासून बिलीएट्सपर्यंत जवळजवळ ५० ते ५५ खेळ प्रकार खेळले जातात. तरी एक ८-१० खेळ सोडले तर खुप काही दुसर्‍या खेळांमध्ये प्रगती होऊ शकलेली आहे अस मला वाटत नाही. परंतु त्या सगळ्या खेळांमध्ये प्रगती होण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज सगळ्या पातळीवर आहे आणि ते करण्यासाठी जे काही सहकार्य आवश्यक असेल ते मी माझ्यावतीने माझ्यापरीने जैन स्पोर्टस् ऍकॅडमीच्या वतीने हे नेहमीच देत आलेलो आहे आणि याच्यापुढेही देत राहणार आहे.

मी वेगवेगळ्या २० संघटनांवर कार्यरत आहे त्या संघटनांच्या मार्फत आम्ही बुद्धीबळ, जलतरण, तायकान्दो, कॅरम, ऍथॅलेटीक, बॅडमिंटन, फुटबॉल, हॉकी, क्रिकेट, रोलबॉल स्केटींग, टेबलटेनिस, व सायकलींग मध्ये वेगवेगळ्या खेळाडूंना आजपर्यंत दत्तक घेतले आहे. आणि त्यांना त्यांच्या ह्या खेळातील प्राविण्यासाठी त्यांना आपल्या शहराच्या लेव्हलवर, राज्य लेव्हलवर, राष्ट्रीय लेव्हलवर आणि आंतरराष्ट्रीय लेव्हलवर सुद्धा त्यांना चांगले कोच उपलब्ध करून दिलेले आहेत. त्यांच्या निवासाची आणि आहाराची व्यवस्था करून दिलेली आहे. त्यांना लागणारे खेळाचे साहित्य आपण उपलब्ध करून दिलेले आहे जेणेकरून हे सगळे खेळाडू त्या त्या क्षेत्रातील त्यांच्या खेळातील क्षेत्रामध्ये त्यांनी आपल्या शहराचे, जिल्ह्याचे, राज्याचे आणि देशाचे नाव उज्ज्वल करावे ही आपली त्याच्यामागची अपेक्षा आहे.

खान्देशच्या मातीने आपल्या देशाला अनेक खेळाडू दिले आहे यात, बुद्धीबळमध्ये भाग्यश्री पाटील व प्रतिक पाटील, जलतरणमध्ये कांचन चौधरी आहे जिला एकलव्य पुरस्कार मिळालेला आहे, आंतरराष्ट्रीय खेळाडू आहे तायकान्दोमध्ये तृप्ती तायडेे व अंकिता पाटील या दोघही आंतरराष्ट्रीय खेळाडू आहेत.  कॅरममध्ये नईम अन्सारी आणि जुबेदसेया मोहसीन आहे ती शिवछत्रपती ऍवार्ड विजेती आहे. ऍथॅटीकमध्ये पंकज वराडे, बबन चव्हाण, अमोल चौधरी, बॅडमिंटनमध्ये आकांक्षा धर्माधिकारी आणि ज्योतिमय दिक्षीत, फुटबॉलमध्ये अरबेज शेख, शेल शेख, गुंजा विश्‍वकर्मा, वैशाली शर्मा. हॉकीमध्ये जागृती काळे, दिपाली चौधरी, सैय्यद शहादाप. क्रिकेटमध्ये जगदिश झोपे, शशांक अत्तरदे, जय दिष्टा. रोलबॉल स्केटींगमध्ये अदित्य खाचणे. टेबलटेनिसमध्ये विवेक अवे. सायकलींगमध्ये निशा कोल्हे जी स्वतः शिवछत्रपती पुरस्कार विजेती आहे. विवेक अवे हा आपला आंतरराष्ट्रीय खेळाडू आहे. या सारखे अनेक खेळाडू जैन स्पोर्टस् ऍकॅडमीच्या माध्यमातून तयार झालेले आहेत. यासारख्या खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर न्यायचे असेल तर त्यांना त्यांच्या खेळाच्या कोचींगसोबत आसपासच जे त्यांच वातावरण आहे ते सुदृढ, निकोप आणि अतिशय आनंदी ठेवण गरजेच आहे. आणि त्यासाठी त्यांना आपल्याला त्यांच्या राहण्याची व्यवस्था, त्यांच्या आहाराची व्यवस्था, खेळ खेळण्यासाठीच्या सगळ्या सुविधांची व्यवस्था, ही आंतरराष्ट्रीय किंवा राष्ट्रीयस्तरावर ज्याप्रमाणे दिल्या जातात त्याच प्रमाणे त्या जिल्ह्यास्तरावरून सुरु झाल्या पाहिजेत, अशी अपेक्षाही श्री.जैन यांनी व्यक्त केली. आगामी काळात जळगावमधून आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू तयार करण्यासाठी तज्ञ प्रशिक्षकांची नियुक्ती करुन खेळाडूंना पूर्णवेळ प्रशिक्षण मिळवून देण्याच्या प्रकल्पावर काम हाती घेण्यात आले आहे. यासह ग्रामीण भागातील विशेषतः आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या आदिवासी बहुल भागातील विद्यार्थ्यांना बुध्दीबळाचे प्रशिक्षण देण्यासाठी महत्वकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. यात सर्व शाळांमधील क्रीडा शिक्षकांच्या मदतीने विद्यार्थ्यांमध्ये बुध्दीबळ खेळाची आवड निर्माण करण्यात येईल, असे अशोकभाऊ जैन यांनी सांगितले.

Post a Comment

Designed By Blogger